Tuesday, June 25, 2019

“यसन कादंबरी वाचून ढसा ढसा रडले विनाअनुदानित शाळेवरचे शिक्षक” (एक अनोळखी पुरूष रडताना ऎकुन मन सुन्न झालं)




मित्रहो, नमस्कार, आज सकाळी एक अनोळखी नंबरहुन फोन अला. आणि बोलाया लागले, “हॅलो, ज्ञानेश्वर जाधवर तुम्हीच का?” मी “हो” म्हणंल आन ते ढसा ढसा रडाया लागले..मी विचारतोय काय झालयं ? ते हुंदके देत बोलतात “मी एका बीड जिल्ह्यातील माध्यमीक विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हाय, गेल्या १० वर्षापासून फुकट नौकरी करतोय, दररोज आतल्या आत कुढतोय, कुणाला दु:ख सांगावा हे कळतच नाय, बायकोच बी डीएड हाय आन ती क्लास वर शिकवतीय”. मी पुढं विचारल, नेमक झालं काय? ते म्हणाले “तुमची यसन कादंबरी वाचली, त्याततील कादंबरीच्या उत्तराधार्तील पावण्याची गोष्ट मला माझीच वाटू लागली आन  पाच सहा वेळा पुस्तका कडे बघत एकटाच आतल्या आत रडत होतो, यसन कादंबरीनं माझ्या दबलेल्या भावनेला वाट करून दिली” .. हे ऎकून माझ्याही डोळ्यात आश्रू आले.. फोनवरच्या आवाजाला बांध फुटला होता.. “मी म्हणत होतो आपण नंतर बोलु पण रडत रडतच फोन कट झाला...  
नंतर फोन करून निंवात बोलेन त्यांच्याशी.. पण जी गोष्ट त्यांनी कादंबरीतील वाचून दडपलेल्या भावनेला वाट करून दिली ती ही...

पावनं बी.ए. बीएड असून ऊस तोडत व्हतं. त्यान्ला सारी पावनं म्हणायची.  १९९८ साली पावण्याला लोणावळ्या जवळच्या एका माध्यमिक विनाअनुदानीत शाळेवर शिकवायला घेतलं. पगार मिळत नव्हता म्हनून त्यांनी लोणवळ्यात सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी लावली. सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी चालवायची आन दिसंभर शाळेत शिकवायच. बायको बी होतकरू व्हती. तिचं डि.एड झाल्याल. तीबी शिलाई मशिन शिकल्याली. कापडं शिवायची. आन संसाराला हात भार लावायची. गावाकडं पावन्याच म्हातारं आय बाप व्हतं. दोन वरीस आसं करता करता ह्यांच चांगल रूटीन लागलं. त्याच शाळेवर आजून एक जागा व्हती म्हनून पावन्यानी बायकोला संस्थापकाच्या हातापाया पडून घ्यायाला लावलं. वीस टक्के अनुदान मिळाल्यामुळं आज ना उद्या फुल पगार मिळलं ह्या आशेवर संसाराचा गाडा हाकत व्हती. ऊस तोडण्यापरीस बर हाय. चार पैस कमी का असाना पन उन्हातान्हाचा तरास नाय.
शाळेत दोघालाबी दहा हजार पगार मिळाया लागल्यावर वडापावाचा गाडा बंद केला. लोणावळ्यातून येऊन जाऊन करायची. जाण्या-येण्यासाठी जुनी मोटारसायकल घेतली. गावाकडी बी चार पैसं द्यायचा. बघता बघता दहा वर्ष झाली आन संस्थेला शंभर टक्के आनुदान मिळालं. शिक्षकांना बी फुल पगार मिळाया लागला. बारा वरीस वाट पाहिल्याच फळं आता मिळालं व्हतं. त्यांचा आनंद गगणात मावाना. गावाकडं आय-बापासाठी सिमेटच्या दोन खोल्या बांधून दिल्या.  ह्यांची लेकर इंग्लिश मिडीयम स्कूल मधी लोणावळ्यात घातली व्हती. सारं कस आता मनासारख झालंत. पन एके दिशी संस्थापकान बोलावलं आन पावन्याच्या पायाखालची जमीन सरकली. पावना कावराबावरा झाला. संस्थापकान सांगितल की रोस्टर बनवलय त्यात ती जागा दुस-या जातीला जातेय. त्याच्यामुळं दोघांपैकी एकाला नौकरी सोडावी लागलं. नाय व्हय करता करता या तिरगा मिरगीत महिना गेला. पावना गांगारून गेल्या सारख कराया लागलं. शेवटी संस्थापकान पावन्याला शाळेतून काढून टाकलं. आन त्यांच्या बायकूला निम्या पगारीवर ठिवलं. त्यांच्या जाग्यावर संस्थापकाच्या नातेवाईकातील नवीन शिक्षक घेताला. पावना मनान खचला व्हता. पन दोन सोन्यासारखी लेकर हायती. त्यांच्याकड बघून स्वत:ला सावरत व्हता. म्हणायचा, “हाताच गेलं काय म्हनून कपाळावरचं नेहील काय कोण?” अस म्हनून त्यांनी परत बंद केलेला वडापावाचा गाडा सुरू केला. आता मातर दिसंभर वडापाव इकायच. दुस-या कुठल्या तरी साळातल्या जागा निघल्यात असं त्यांच्या मित्रान सांगितलं तर त्यांन मित्राला श्या दिवून घराच्या बाहेर लावलं. “आयुष्यात पुन्हा मातर शिक्षक व्हणार नाय. निम्म आयुष्य गेलंय. ऊस तोडलं, भंग्याचा डब्बा उचलल पन फुकटचा मास्तर व्हनार नाय. संस्थापक गांडू हायती. आमच्या रक्तावर जगत्यात. आमच शोषण करत्यात. आमच्या कष्टाचा पैसा खात्याती... मादरचोद साले...” आस म्हणायचा आन राग राग दिसलं ते भांडी फेकून द्यायचा.
कसंतरी सावरत वडापावाची गाडी चालवत स्वत:ला धीर देत बायकोच्या येणा-या पगारीवर घर चालत व्हतं. ह्याच्यात वरीस गेलं. पन त्यांची बायको आतून खचत चालली व्हती. सारखं गेल्या दोन महिन्यापासून एकटक बघायची. शाळेतून आली की तिला काय काम करतेय तेच कळायच नाय. पावनं इचारायच, “काय झालय तुला? तू आशी का वागतेयस?” पन त्या काय बोलत नव्हत्या. तीन चार महिन ओलांडलं. त्यात मातर त्या पार गळून गेल्या. कुनाला सांगावा हेच कळत नव्हतं. परमुलखातून जगायला इकडं आलाव आन काय पदरात वाडुन ठेवलय. कुनाला बोलाया जावा तर नौकरी जाईल मग काय करायच? नव-याला सांगाव तर दुसरच काय तरी हुईल. ह्याच्यात त्या बाई पार आतून पिळवटून गेल्या. शाळेत त्यांच शिकवण्यावर लक्ष लागाना. कवा कवा तर साळा  सुट्ल्याली बी कळायच नाय. आश्यात त्यांनी एक दिशी स्वता:ला संपवलं. शाळेत विज्ञानाच्या प्रयोग शाळेत विष पेऊन आत्महत्या केली.
पावन्याना तर जगूच नाय अस वाटाया लागलं. सा-या शाळेत चर्चा व्हती की संस्थापकाने जबरदस्तीने बाईंनवर अत्याचार केला व्हता. अगोदरच नव-याची नौकरी गेल्याली म्ह्णून त्या कुणालाच बोलल्या नायत. एकदा झालं दोनदा झालं त्यांनी गपचूप सहन केलं. पन पुन्हा पुन्हा हे सहन व्हतं नव्हतं. चारित्र्य हे सर्वस्व माननारी बाई तेच गेल्यावर काय म्हनून जगायच. कोणत्या तोंडान समाज्यासमोर उभा राहायच? पावन्यारावळ्यात कसं जायच? नव-याला काय सांगायच?. लेकराना कस तोंड दाखवायच? आन त्याच्या पेक्षाही कहर म्हंजी विद्यार्थ्यान समोर आत्मविश्वासनं कंस शिकवायच? या इचाराने त्या बाई गळून गेल्या आन स्वता: जिवन संपवण्याचा मार्ग जवळचा केला.
संस्थापकाने हे प्रकरण खूप शितापीने मिटवलं. त्या बाईच्या जाग्यावर दुसरी मॅडम घेतली. आन साळा सुरू राहिली. पन आमच्या पावन्याच घर उधवस्त झालय. आयुष्य लयाला लागलंय. एवढ हुवून ही बिचारे पावने दोन निरागस लेकराकड बघत. वडापावाची गाडी लावून शाळेसमोर वडापाव इकतात आन तुटलेला संसार चालवतात.


Saturday, June 15, 2019

पुण्यात साहित्य व कला का टिकून आहे?




त्याच झालं असं की सध्या यसन कादंबरी वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकांना देत आहे. त्या दिवशी सांयकाळची ६ ची वेळ होती. तसं अगोदरच श्री. अभय व सौ. रजनी माटे यांची वेळ घेवूनच त्यांच्या घरी गेलो. मला वाटलं कादंबरी देवून लगेच निघावं. पण गेल्या गेल्या पाच मिनीट शांत बसलो. रजनी माटे यांनी सरबत दिला. मग अभय माटे आले. कादंबरी विषयी विचारू लागले. त्यांनी त्यांच्या बालपणात यसन हा शब्द ऎकलेला त्यामुळे त्यांना लक्षात आलं. कादंबरीचा आशय वाचला आणि बोलाया लागले,
“समाजात अनेक स्तरावर वेगवेगळे लोक आहेत, आपण सर्वचं एकमेकांवर अवलंबून आहोत. कुणीना कुणी कुणाची तरी यसन पकडून ठेवतोय..पण सकारात्म असली पाहिजे, अन्याय व शोषणाच्या यसन तोडल्या पाहिजे”. अशा गप्पा सुरू असतानाच माटे मॅडमनी आइस्क्रीम आणलं आणि त्या म्हणाल्या, “लवकर खा नाही तर ते वितळून जाईल” माझ्या मनात आलं “आयुष्य ही असंच आहे, लवकर व्यवस्थित जगलो नाही तर पघळून बेरस होत. त्याच्यात साहित्य, कला, संगीत, खेळ, अध्यात्म यांचे रस भरून सुग्रास केलं पाहिजे”.
     असं बोलून कादंबरी भेट देवून निघालो, तर माटे सर म्हणाले, “थांब ज्ञानेश्वर, याचे तुला काही पैसे द्यायचेत” मी म्हणालो, “सर नको, हे माझ्याकडून तुम्हांला भेट”. मग त्यावर ते म्हणाले, “तू असं समज की तुझ्या पुढच्या पुस्तकाला आमच्याकडून ही छोटीशी भेट.. ही घे”. मग बळचं नग नग म्हणत असताना त्यांनी एक बंद पाकीट दिलं. लगेच त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर आलो. मला उत्सुकता लागली की काय बरं दिलं असेल पाकीटात? पैसे असतील का? किती असतील? मग मी पार्कींग मध्येच कोणी आपल्याकडे बघतय का? याचा कानोसा घेऊन पाकीट ऊघडून पाहिलं तर त्याच्यात ५०० रुपये होते. मला आश्चर्य वाटलं की पुस्तकाची किमंत २५० आहे. सध्या तर डिस्कांट देवून २०० रुपयाला देतोय.. आणि जवळपास १०० पुस्तक मोफत दिल्यात. मग यांनी एवढ्या कौतुकाने मला एवढे पैसे कसे काय दिले? मला वाटाया लागल की आपण परत नेहून द्यावं नाही तर अजून एक पुस्तक द्यावं.. पण त्यांचे दोन वाक्य कानात घोंघावू लागली की “तुझ्या पुढच्या कामाला आमच्याकडून ही छोटीशी मदत”.  मग मला जाणवलं की हे फक्त पुण्यातच घडू शकत. आता मला कळतय की पुण्यात साहित्य व कला का वाढतेय? तर यांच उत्तर इथल्या जाणकार नागरिकांच्या संस्कारात आहे. हेच मला श्री व सौ माटेंकडे जाणवलं. म्हणूनच पुण्यात कला व साहित्य भरभराटीस येत आहे व टिकून ही आहे. मुलांच जसं संगोपन करतो तसच एखाद्या कलाकृतीच कराव लागतं. तेच या पुण्यात केलं जातं.   

Thursday, June 13, 2019

मोठी माणसं मोठी का होतात?






मोठी माणसं ही अगोदरचं विचाराने व मनाने मोठी असतात. ज्यावेळी त्यांच्याकडे साधनसंपत्ती, पैसा व प्रतिष्ठा नसते त्यावेळी ही ते मनाने व विचाराने मोठेच असतात. फरक एवढाच असतो की ते फक्त जगाला माहित नसत. आणि ज्यावेळी त्यांच्याकडे साधनसंपत्ती, प्रतिष्ठा व पैसा येतो त्यावेळी सारं जग म्हणतं की तो माणूस खूप मोठा आहे. पण मला वाटत की मोठी माणसं ही मोठ्या पध्दतीने मोठ्या कामाचा विचार करतात म्हणून मोठी असतात.
मला सांगावास वाटतं की डॉक्टर हरिश पाटणकर हे या मोठ्या विचारांच व्यक्तीमत्व. तुम्ही म्हणाल का? डॉ.पाटणकरांना मी गेल्या १० वर्षापासून ऒळखतोय. त्यांनी त्यांच क्लिनीक एका दहा बाय दहाच्या खॊलीत सुरू केलं होत. आजही ते आहे. पण सोबत त्यांनी केशार्वेद हा ब्रॅंड उभा केला. ज्याचे आज १०८ पेक्षा जास्त केंद्र जगभर आहेत. हे गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिलं आहे.
त्यांनी “यसन” कादंबरी विषयी फेसबुकवर बरचं वाचल आणि कौतुक करुन भेटीला बोलावलं. भेटण्यासाठी गेलो. पुस्तक दिलं. आणि निघण्यासाठी बॅग उचलली तर डॉक्टर म्हणाले, “ज्ञानेश्वर माझ्याकडून हे “यसन” काही लोकांना भेट देत आहे, हा २००० रुपयाचा चेक घे” मला हे ऎकून आश्चर्याचा सुखद धक्का बसला की एवढ्या सहजपणे त्यांनी दोन हजार रुपयांची पुस्तक विकत घेतली. ते ही एका नविन लिहाणा-या मुलाकडून. मग मी म्हणालो, “सर एवढ्या सहजपणे तुम्ही हे केलंत?” त्यावर ते म्हणाले, “आम्हांला ही आगोदर अशीच मदत काही मान्यवरांकडून मिळाली, त्यांच्यामुळे आम्ही उभा राहिलो, आता आम्ही येणा-या नव्या पिढीला आधार देऊ शकतो.. हेच चालत राहिलं पाहिजे तरच टिकून राहिलं”. मग मला जाणवलं की मोठ्या विचाराच्या व्यक्ती मध्ये दुस-यांना सामावून घेण्याचा मोठेपणा असतो म्हणूनच ते समाजमान्य मोठे असतात.    

Wednesday, June 12, 2019





“यसन” कादंबरीच परीक्षण
                       
        जीवन हे जर स्वत:ला मुक्त करण्याचं युध्द आहे, तर मानवी भावना, नातीगोती, सामाजिक धार्मिक, आर्थिक परिस्थिती ही विविध प्रकारची बंधन त्याला युध्दापासून येनकेन प्रकारे परावृत्त करत असतात जेनेकरुन तो नेहमी गुलामीत असला पाहिजे. प्रत्येक वेळी हे शक्य नाही. स्वत:चं सार्मथ्य, अस्तित्व आणि कर्तत्वाची जाणिव करून द्यायला कोणी श्रीकृष्ण, महात्मा फुले वा आंबेडकर येईल असं नाही. यसनी (वेसणी) या स्वता:च तोडण्यात पुरुषार्थ आहे. “You are the stone, You are the chisel and You are the sculpture”.  तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार या धोरणानेच कादंबरीच्या नायकाचे जीवन घडत गेले आहे.
       ज्ञानेश्वर जाधवर लिखित यसन या कादंबरीतला नायक वामन विठठल सोनवणे हा सिध्दांत जगलेला आहे. म्हणतात ना पिल्लू ज्यावेळी अंड्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत त्यावेळी त्याला बाहेरून मदत केली नाही पाहिजे कारण जीवनाला बाह्य रुप देण्याचा तो संघर्षच त्याच्या पंखाना बळ देते. जेने करून नंतर तो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. वामनचा जन्मही सांकेतिक आर्थाने असाच ऊसाच्या फडात होतो. दवाखान्याची वाट न पाहणे म्हणजे यसन तोडण्याची एक प्रकारची ती सुरवातच. जन्म घेण्यापासून संघर्षाने सुरवात झालेली ही कथा. जगण्यासाठीची धडपड, पोटापाण्याचे प्रश्न, नात्यागोत्यातील नेहमीची ऒढाताण, विविध घटना आणि प्रसंगाच्या माध्यमातून स्थळ आणि काळाचा प्रवास करत जाते. कादंबरीचं संपूर्ण कथानक म्हणजे वामनने हाल अपेष्टा सहन करून परिस्थितीशी झुंज देत स्वता:च अस्तित्व कसं निर्माण केलं याच जिंवत वर्णन आहे. पण मग नायकाकडे दया व करूणेच्या दृष्टीतून पाहिलं पाहिजे का? म्हणजे हे ही एक प्रकारे संघर्षमय आयुष्याला चुकीच्या दृष्टीकोनातून पाहाण्याच यसन नाही का? वसिम बरलेवीच्या चार ऒळी आठवत आहेत.
जो सफर इख्तयार करते है!
वही तो दरीया पार करते है!
चलके तो देखीए जरा!
मुसाफिरो का रास्ते भी इंतजार करते है!
        जन्मानंतर मरेपर्यंत जगणे याला जीवन म्हणत नाहीत. जीवन हा प्रवास आहे. वामनच जीवन हे जरी संकट अडीअडचनीन भरलेलं असलं तरी त्याच्यात चालण्याच्या अदम्या विश्वासाने वेळॊ वेळी त्याला मार्ग मिळवून दिले आहेत. पैस्याची आडचण तर होतीच, उचललेल्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याने भाजी विकली, क्लीनर बनला, STD चालवली, कपड्याच्या दुकानात काम केलं. व या आनुभवाच्या आधारे कथाकथनाचे कार्यक्रम करायला लागला. अशा या संघर्षासोबतच शंकुतला बाई सोबतच अबोल नात, योगीताच्या सहवासात बहरलेल प्रेम असे काही हळवार प्रसंग भावनेला फुंकार घालतात. वामन च्या जीवनात कोणीही आयडल नाही किंवा त्याचा देवावरही विश्वास नाही तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधत आलाय त्यामुळे त्याची होणारी घुसमट होते. हे त्याच्या आत्मसंवादातून दिसून येत.  शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्यातून होणारे शोषण याचं समर्पक चित्रण केलेलं आहे.  “यसन” हे दुस-याच्या हातात असतं हे सत्य आहे पण ते यसन कसं तोडलं जाऊ शकतं याच जीवंत चित्र कादंबरीत आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. एक मुरलेला चित्रकार जसे हळूवार हाताने चित्र बनवतो तशीच ग्रामीण भाषेत लिहलेली ही कादंबरी. शब्दाच्या माध्यमातून ऊस तोडकामगार आणि त्याच्या मुलाच्यां सर्घर्षाचं एक चित्र डोळ्यासमोर उभा करते. भाषेचा ऒघवतेपणा व वर्णन केलेल्या प्रसंगात खिळवून ठेवन्याची ताकद हे या कादंबरीच्या जमेच्या बाजू आहेत. ज्यांनी कोणी आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे त्याला ही कादंबरी आपलीच कथा सांगत आहे असं आपसूकच वाटून जात.
ये मै ही था, बचाके खुदको ले आया किनारे तक!
आरे संमदरने बहोत मोका दिया था डुब जाने का!
      वामनची नाव तर डौलाने समुद्राच्या हेलकाव्यासहित प्रवास करीत आहे. पण ज्यांना ह्या लाटांची आणि तुफानांची भीती वाटते त्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी.
 प्रा. हुसेन शेख (मो. ८१४९०४५६९७)(एम.आय.टी. कॉलेज, आळंदी, पुणे)
                                                   
          

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts