
सारी लाडानं त्याला सम्या
म्हणायची. पण त्याचं नाव समीर. सम्याला १० वीला ८८% मार्क मिळाले. आईबाप लय खुश
झालेलं. त्या दिवशी वस्तीत पेढं वाटलेलं. वस्ती म्हंजी जिथ बांधकाम सुरू आसलं तिथ
२०-२५ कुटूंबाची बाजुला पत्रा ठोकून उभा केलेली घरं. तिथ ना टॉयलेटची सुवीधा, ना
बाथरूमची सोय, असं म्हणतात मजुराला कशाला पाहिजे आसल्या सोई? पिण्याचं पाणी
बाधंकामाला वापरलं जाईल पण मजुरांना प्यायला दिलं जात नाही. जिथून मिळलं तिथून
पाणी आनावं लागत. बाजूनच वाहाणा-या गटारींची
दुर्गंधी पण आसल्या कशाचीही फिकीर न करता हे काबाड कष्ट करणारे भारत देशातील मजुर
रांत्रादिवस काम करतात. त्यांच्यापैकीच हे समीरचे आईवाडिल. त्याचे आईवडिल बिगारी
काम करायचे. आज ह्या मिस्त्रीच्या हाताखाली तर उद्या त्या मिस्त्रीच्या हाताखाली.
कवा कामं मिळायचं तर कवा मिळत नव्हत. पण हार न मानता काबाड कष्ट करीत करीत समीरला
आन त्याच्य मोठ्या भावाला शिक्षण दिलं पण मोठा भाऊ काय शिकला नाही. तो
आईवडिलांसोबत बिगारी काम कराया लागला. त्याल काम बी जमाया लागलं म्हणून २० व्या
वर्षीचं त्याच लगीन १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं. आन दोघंबी जोडीन कामाला लागली. म्हणून
सा-यांना वाटायचं की सम्यांन तरी शिकाव आन
इंजिनिअर नाही तर ठेकेदार व्हाव. सम्याच्या आईबापाला बी लय वाटायच की माझ्या
पोरांन सायब व्हाव. दहावीला ८८ टक्के मार्क मिळाल्यामुळं सारीजण त्यांच कौतुक करीत
व्हती. त्याला बी वाटायच आपुन चांगल शिकुन इंजिनिअर व्हाव. म्हणून त्यांन चौकशी
करून डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंगच्या कोर्सला प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्याला
वाटायाचं की बिल्डींगी बाधंणारा इंजिनीअर व्हाव. कारण तो कवा बवा आईबापासोबत बांधकामावर
कामाला जायचा तवा त्यांनं पाहिला होता
ठेकेदाराच आन इंजिनिअर चा रूबाब, म्हणून त्याच्या मनात बसलं व्हतं की आपण मोठा
इंजिनिअर व्हयचं.
त्याला
आसं बी वाटायचं की आपुन सा-या घरांच पांग फेडनार हाय. म्हणून तो चिकाटीन अभ्यास
करायचा. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यामुळं सारी कागदपत्र जमवण्याची धावपळं सुरू
झाली. रहिवासी दाखला आणाया त्याच्या दादाला (भाऊ) मुळं गावी म्हंजी जालन्याला
पाठवलं. शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला आन मार्कलिस्ट मिळालं व्हतं. उत्पन्नाचा
दाखाला काढण्यासाठी सेतू कार्यालयात फे-या मारत व्हता. त्या दिवशी झेरॉक्सच्या
दुकानात मार्कलिस्टला लॅमिनेशन करून घॆतलं. सारी शिकलेली माणसं सांगायची की “आयुष्याची
डिग्री हाय, मार्कलिस्टला जपावं लागतय, पावसात भिजू नाय म्हणून लॅमिनेशन करून ठिवं”
म्हणून सम्यान मार्कलिस्टला लॅमिनेशन केलं. पण बघाना देह टिकवण्यासाठी देहाला लॅमिनेशन
नाही करता येतं. तिथून तो डिप्लोमाला आडमिशेन घेण्यासाठी कॉलेजला गेला. सिव्हील
इंजिनिअरिंग चा आर्ज घेतला. आता तो खूश होता. सरांनी सांगितल्या प्रमाणे राहिलेली
कागदपत्र तो पुढच्या आठवड्यात आणून देतो असं म्हणून तो घरी आला. आईन विचारलं, “झालं
का रं आडमिशेन?” तो हसत म्हणाला, “ नाही आजुन, सारी कागदपत्र घिऊन बोलवलय दोन दिवसात.”
त्याचा दादा गावाकडून रहिवासी प्रमाणपत्र आणाया गेलता. तो आला की सम्याच आडमिशेन
होणार व्हतं. आई वडिलानां सारं समजावून सांगितलं.
आता रात्रीच्या
आठ वाजल्या होत्या. पावसाची रिपरिप सुरू होती. दोन दिवसापासून पाऊस उघडला नव्हता.
आगूदरच पाणी नाही म्हणून तरसलेली लोकं पाऊस आलाय म्हणून आनंदी व्हती. पत्र्याच्या
शेडमधी पावसाचं पाणी येऊ नाय म्हणून ताडपत्री लावली व्हती. त्याच्यामुळं आडूका
मिळायचा. कुठं बुठं टिपकायचं म्हणून पातेलं, तांब्या, बादली ठिवली व्हती. लाईट
नसल्यामुळं आंधारात किती वलं झालय हे काय दिसतं नव्हतं. त्याच्यातचं जेवायला बसली.
आईन सा-यांस्नी वाढून घेतलं. थोरल्या सुनानं सैपाक केला व्हता. दिराला मार्क लय
पडल्यात म्हणून आज गोड गुळाची खिर केलती. सोबत भजं आन पापड्या कुरवड्या तळल्या
व्हत्या. सम्या आईकडं बघत म्हणला, “जेवायला दादा असता तरं बरं झालं असतं. पण आई
म्हणली, “तो माघारी आला की पुन्हा एकदा करु की खिरं, त्याच काय, आज तुला आवडती
म्हणून केली.” आसं बोलत बोलत आनंदात जेवणं
झाली. वडिल मध्येच म्हणलं, “सम्या, उद्या लय काम हाय, तू चल आमच्या संग, दादा
येईपस्तोर, तो दुपार पस्तोर येईल”. लगेच सम्या उदास हुवून,“नाय, मला ते आडमिशेनच
बघायचय”. असं म्हणल्यावर आई म्हणली, “बरं बाबा, बग जा, ह्या कामात सारी हाडाची
काडं झाली, तू शिकलास तर आमचं पागं फिटलं”.
आसं बोलता बोलता हातरून टाकलं आन झोपाया
लागली. आता पावसाची धार वाढली व्हती. चार दिवसापासून येणारा हा पाऊस जमिनीत
चांगलाच मुरला व्हता. लावलेला दिवा तेवत व्हता. समीरंन झोपन्या अगोदर सारी
कागदपत्र काढून दिव्याच्या उजेडात बघितली. मार्कलिस्ट आता चांगल दिसत व्हतं. समीर
तिनदा तिनदा त्या मार्कांकड बघायचा आन आतल्या आत हसायचा. मध्येच आभाळ गर्जल्याचा
आवाज यायचा. विज चमकल्यामुळं वस्ती त्या अंधारात उठावून दिसायची. जणू काय विज
सम्याचं कौतुक करतेय. समीरंन एकदा बाहेर
डोकावून बघितलं, आंधार काळाकुट्ट पडला होता. आजूबाजुला जाणा-या वाहनांचा आवाज
यायचा. लांबवर कुत्र भुकल्याचा आवाज यायचा. त्यामुळं सम्याला भिती वाटली. आता सारी
शांत निपचित झोपली होती. सम्यानही कागदपत्राची पिशवी कोप-याला ठेवली आन
हातारलेल्या पोत्यावर झोपला.
यातल्या कुणालाच वाटलं नाय की ही आजची रात्र
आपली शेवटीची रात्र असणार हाय. ही काळ रात्र, झिमझिमनारा हा पाऊस, हा आभाळ
गर्जल्याचा आवाज, आन विजांचा प्रकाश आम्हची चित्ता उद्या झाळनार हाय. यातलं कुठलही
काहीही मनात न येता ते निश्चीत धरणीमायेच्या कुशीत निजले होते. पण काळाच्या
व्यवस्थेन त्यांच्यावर घाला केला आन मध्यरात्रीच्या सुमारास उच्चभ्रूंच्या
संरक्षणासाठी बांधलेली सिमाभिंत कोसळली ती दुस-यांना घरात राहात यावं म्हणून घर
बांधणा-या कष्टकरी मजुरांच्या घरावर आन त्यात त्यांच्या स्वप्नाबरोबर त्यांची
आयुष्य भिंतीच्या ढिगा-याखाली कधी न उठण्यासाठी गाडली गेली. पण त्यांच्यातील
सम्याच आत्मा आजून गुदमरतोय, आजूबाजूला फिरतोय, आन त्याचं मार्कलिस्ट त्याच्याकडं
बघून त्याला खुणवतय...
सिमाभिंतीखाली ८८% मार्कस दिसणारं
दहावीच्या बोर्डाचं मार्कलिस्ट दिसतयं. आन त्या मार्कलिस्टच्या भोवती सम्याचा
(समीर) आत्मा फिरतोय. आन गुदमरतोय, मार्कलिस्ट त्याच्याकडं बघून म्हणतय, “आता काय
करशील या मार्काचं? मला बी सोबत घिऊन चल. इथं राहुन माझा तरी काय उपयोग?” सम्या
त्याला म्हणतो, “आर मार्कलिस्टा, मला जायची इच्छा नाय रं पण बळचं जावा लागतय. पण
तुला कसा नेहू र? तू तिथचं पडून राहा निपचीत. कुणी तर उचलून तुला कच-यात फेकतील.
तसं म्हणाव तर आपून आगुदरच कच-यात हाव”. तेवढ्यात समीरच्या आत्म्याला बाजून पाचसहा
माणसं आलेली दिसली जी भिंतीखाली दबलेलं सामान आन माणसांना बाहेर काढत व्हती.
त्यावेळी त्याचं लक्ष आईकडं गेलं, तर आईला ढिगा-यातून काढत व्हती. समीर म्हणतोय “आयला
हळून काढा.. तिला खूप तरास झालाय.. सारं आयुष्य जिजवलय़.. म्या तिच्यामुळंच शिकून
इंजिनिअर व्हणार व्हतो पण हे अवचितच निराळं कसं घडलं?” पलिकडच्या बाजुन त्याचा दादा
आला. त्याला बघून समिरचा आत्मा टाहोफोडून रडत व्हता. म्हणत व्हता की, “ काल आम्ही
गोड खिरं केलती, तुलापण आवडती ना?” आई
म्हणली, “तुझ्यासाठी पुन्हा करू” असं म्हणतो आन दिसणा-या आई-वडिलांकड बघून
जोरजोरात रडायला लागतो. त्याच्या डोळ्यातील आश्रु बघून ८८% चं मार्कलिस्ट आतल्या
आत धुमसत व्हतं. आन मार्कलिस्टवर पडलेल्या पावसाच्या थेंबामुळं मार्कलिस्टच्या
डोळ्यातून आश्रू येताय असचं वाटतय.
(टिप: कथा काल्पनिक आहे पण सध्या सिमाभिंत कोसळून मृत्यू झालेल्या घटनेचा
संर्दभ आहे.)