Friday, August 30, 2019

बैलपोळा (यसन सैल केलेला दिवस)



वयात आल्या आल्या बैलाच्या नाकात यसन बांधली जाते ती बैल जिंवत असे पर्यंत नाकात असते पण ज्यादिवशी सैल केली जाते तो दिवस म्हंणजे बैलांचा सण “बैलपोळा”.
माझं आता बालवाडीत जाण सुरू व्हतं. खायाला सुकडी मिळायची. कवा कवा भात, आन एक एक अंडी बी द्यायची. मला लय भारी वाटायंच. बई बी मला पुढ बसवायच्या. लेकरांना गप बसवायला सांगयच्या. म्या मोठा असल्यामुंळ सारी लेकरं भ्यायची. एकदा तर म्या मला दिल्याली सुकडी कागदात बांधून सादू बैलाला आणली. त्याच्या म्होर ठिवली. त्यान बी दोन घासातच संपवली. म्या मग दररोज माझ्यातली थोडी सुकडी आणायचॊ आन सादुला द्यायचॊ. मला लई वाटायच. म्या जर डाकटर असतो तर ह्याला एका झटक्यात निट केला असता. बप्पा का ह्याला दवाखान्यात नेत नायती. लय ब-या म्या नानाला अन बप्पा ला म्हण्लं सादूला दवाकान्यात दाखवा. एकदा दोनदा डाकटर बोलवला पन काय फरक पडला नाय.
बैल पोळ्याचा सन जवळ आला व्हता. दोन दिसावर व्हता. बैल धुवायची. त्यांना चांगली आंगूळ घालायची. म्या दुस-या बैलाकड नाय पन सादुचं सार करू लागायचॊ. म्या बैलाला रंगवायचो. त्यांच्या शिंगाला हेंगुळ लावून त्याच्यावर रंगाच्या पताका लावायच्या. पाठी-पोटावर चित्र काढायचॊ. त्या दिशी बैलाला खाऊ पिऊ भरपूर घालायच. कोणत्याच कामाला जुपायच नाय. सगळं झालं की गावातून हलकी वाजवत मिरवणुक काढायची. नेमकं सादुला उठायला बी येत नव्हतं. बळच उठवलं. जाग्यावरच आंग धुतलं. शिंगाला हेंगुळ लावला. आंगावर झुल टाकली. आन दोन्ही बैलाची गावातून मिरवणूक काढायची म्हनून बप्पान धरून पुढ आणली.
गावात बैल मिरवण्याचा पहिला मान हा पाटलाचा. पाटलाची बैल इशीवरून गेली की मग त्याच्या माग सा-या गावान न्यायची. पन त्या साली गावात एका धनगाराच्या माणसांन नविनच बैल जोडी घेतली व्हती. त्यांन गावात सगळ्याच्या आधी मिरवणूक काढायला सुरवात केली. ही बातम्या पाटलाकडं गेली. तशी पाटलाची माणसं भाडंणाला आली. जोरात भांडण लागली. बैलाला काठ्यान माराया लागली. चार गावातली शाहाणी माणसं पुढं हुवून वाद मिटवाया लागली. धनगाराची पोरं बी मारामारीला उठली. कसं तर वाद मिटला. त्या धनगाराला माहिती नव्हतं की पहिला मान हा पाटलाचा असतो. त्यो पहिल्यांदाच बैल घेऊन शेती कराया लागला व्हता.
आमचा सादू काय चालाना. शेवटी वैतागून म्हादुची आन एका वासराची आमच्या भावकीतल बबनआण्णाच्या बैलासोबत मिरवणूक काढली. मिरवणुक झाली की एक गाय् जोडीला उबा करून लगीन लावायची परंपरा हाय. तसं भावकीतील तीन बैल जोड्या एक गाय आन आमची बैल उबा केली. सादू थोडायेळ उबा राहिला. पुन्हा खाली बसला. लगीन लावण्यासाठी बामनाला बोलवाव लागंत. गावात एकच बामन असल्यामुळं सगळ्या गावातील लगनं लावायच म्हण्ल की उशीर व्हायचा. आमच्या बप्पाला बी मंगळअष्टका यायच्या. बामन नाय आला की बप्पा बी बैलाची लगनं लावायचं. मग बप्पानंच मंगळ अष्टक सुरू केलं. म्या सादूच्या जवळंच बसलो व्हतो. लगनं लाऊन झालं की एका मोठ्या पाटीत चाड-नळ (पेरणी करण्यासाठी वापरतात) गाडग, पुरण-पोळ्या, अन गाईच गोमतर ठिवून ती पाटी बैलाच्या मालकाच्या डोक्यावर दिली जाते. मालकांन आंगावर घोंगडी घ्यावी लागते. हे सगळ घेऊन बैलाच्या बाजून पाच फे-या मारावा लागतात. हे करताना माग एक दोन लेकरं परात नायतर पाटी वाजवत पळतात. त्या साली म्या परत घेतली अन.. नानाच्या माग पळत व्हतो. ते पुढ म्हनायचे “चौर चौर चांगभल!  म्या माग म्हनायच “चांगभल”  “चौर चौर चांगभल!  म्या “चांगभल”   “चौर चौर चांगभल! म्या “चांगभल”   म्हसोबाच्या नावान! मागून म्या “चांगभल” येडाईच्या नावान “ चांगभल” असं करत फे-या माराव्या लागल्या.  
मला लय भारी वाटलं परात वाजवाताना. झाल्यावर म्या सादूच्या जवळ आलो. सा-याची बैल त्यांच्या त्यांच्या दावणीला बांधली. म्हादू ला बी नेऊन बांधल. पन सादू काय उठाना. रात्रभर तीथच व्हता. दुस-या दिशी पाच-सहा माणसानी काट्याटाकून उचलून दावणीला आणून ठिवला. पुन्हा काय जाग्यावरचा उठला नाय. त्याचा शेवटाचा दिसं व्हता. म्या बालवाडीतून आलो. त्या दिशी आम्हांला सुकडी आन अंड बी दिल्याल. म्या थोडी सुकडी आन आंड घिऊन आलो. सादुच्या म्होर ठिवलं. त्यान काय खाल नाय. का खात नाय म्हनून म्या त्याला उठवाया लागलो. पन त्यो काय हालाचना. माशा घोंगावत व्हत्या. माझा आवाज ऎकून बप्पा आलं. त्यांनी बगीतंल आन तोंड बारीक करून नाना ला आवाज दिला “नाना आर इकड ये, सादु मेला” असं म्हणल्य म्हणल्या मला रडू आलं. म्या मोठ्यान रडाय लागलो. आय आन काकू बाहिर आल्या. आयन मला काकाला घेतलं. नानाच बी डोळ पाणावल् व्हतं. बप्पा बी रडाय लागलं. थोड्या येळानं खाटीक आला. बप्पानी त्याला द्यायचा ठरवलं व्हतं. पन म्या लय रडलो. बैल काय खटकाला इकु दिला नाय. आमच्या रानात नेहुन पुरला. त्याच्यावर आम्ही एक मोठा दगड ठिवल्याला हाय.  आन काटाडी टाकली. पाच –सहा वरिस ऊसाला गाडी वडायला हाच सादू बैल व्हता. हिरीचा खड्डा बघून उडी मारणारा हाच सादू व्हता. रस्त्यांनी सरळ चाळणारा हाच सादु व्हता. गाडित कितीबी बोजा भरला तरी नेट लावून वडणारा हाच सादू व्हता. ट्राफिक बघून जाग्यावर थांबणारा हाच सादू. तरीबी बप्पा आज त्याला खाटकाला द्यायला निघाल व्हतं का तर संसार लय फाटल्याला व्ह्ता ! पुन्हा न शिवण्यासाठी!

(यसन कादंबरीतून पान नंबर ३२,३३,३४ वरून साभार- )

Thursday, August 29, 2019

“ भटक्या जमातीतील प्रकांडपंडित माणूस म्हणजे रावण (राजा राक्षसांचा)”






नुकतीच शरद तांदळे लिखीत व न्य़ू ईरा पब्लीशींग हाऊस प्रकाशित “रावण” ( राजा राक्षसांचा) ही कादंबरी वाचली आणि आजपर्यत ऎकलेल्या पुराणकथेतील गोष्टीनां छेद मिळाला. लहानपणापासून वाटायचं की रावण हा राक्षसच आहे आणि सर्व राक्षस वाईट असतात. पण कादंबरी वाचल्यानंतर जाणवल की रावण हा प्रकांडपंडित माणूस होता. शरद तांदळेनी रावणाची व्यक्तीरेखा माणूस म्हणून समोर आणली आहे. आणि ते आताच्या विवेकी विचार करणा-या माणसाला पटण्यासारखी आहे. कारण राक्षस हे वाईट होते त्यांनी अन्याय अत्याचार केला आहे असचं अनेक गोष्टीतून आणि पुराणातून ऎकायला मिळालं आहे. पण कधीच हा प्रश्न उपस्थित झाला नाही की राक्षस हे कोण होते? ते का बरं अन्याय अत्याचार करत होते? ते मूळचे कुठले? ते दिसायला एवढे कुरूप कसे असायचे? त्यांच्यात एवढी ताकत कशी यायची? ते जंगलातच का राहायचे? त्यांची घर नव्हती का? ते रानटी आदिमानवासारखे का वागायचे? या सा-या प्रश्नांचा विचार केल्यावर हळू हळू जाणवायाला लागतं की राक्षस हा मुळचा जंगलात राहाणारा, मांसाहार करणारा, रानटी जमातीतील माणुस होता. त्यांना माणूस होण्याची संधीच मिळाली नाही त्या कालखंडात. म्हणून त्यांच्यावर राक्षस असा शिक्का मारला गेला. याच्या पाठीमागे महत्वाच कारण आहे ते राजसत्ता या जमातीत वारंवार युध्द व्हायची आणि रज्य तू चालवू शकतो का मी? यात अनेक जमाती होत्या. त्यातील आपल्या लक्षात राहिल्या त्या “देव” व “रक्षास” या नावाने. यातील मधला मार्ग निघाला तो नंतरच्या कालखंडात तो म्हणजे “माणूस”. देव जमातही माणूसच होती आणि राक्षस जमातही माणूस च होती हे कळायला मोठा कालखंड लोटला. हेच शरद तांदळेची रावण कादंबरी वाचल्यावर कळायला मदत होते.   
       असुरांच्या कुळात अनेक वंश होते. दानव, दैत्य, आसुर, नाग, गरूड, या वंशातील लोक हे जंगलात राहत असत. त्यांना जगण्यासाठी वृत्तासुरांन स्थर्य दिलं. नंतर त्याच कुळातील बळी राजांनं त्यांना स्थैर्य दिलं. शेतीचा विकास केला. आणि रानटी जंगली माणसांना शॆती करायला लावलं. त्यामुळे काही प्रमाणात गाव वसली आणि आसुरांचा रानटीपणा कमी झाला. पुढं बळीराजांचं राज्य वामनानं जिंकलं आणि परत आसुरारंनवर अत्याचार सुरू झाले. या सर्व कुळातील रानटी माणसांना रावणाने राक्षस कुळाच्या नावाखाली एकत्र आणलं आहे. आणि तिथेच त्यांना राक्षसातील माणूस घडवण्याचा प्रयत्न झाला आहे असं कादंबरीत वाचायला मिळतं. लंके मध्ये प्रत्येक नागरिकाला मुलभुत जगण्याचे हक्क होते. प्रजेला सोन्याचे भवन बांधून दिले होते. रावणाच्या सेनेत काम करणा-या प्रत्येक सैनिकाला घर आणि पगार दिला जायचा. त्यामुळेच लंकेच राज्य व्यवस्थित चालत होत. जर ते राक्षस असते तर सोन्याची लंका उभा राहिलीच नसती. त्यांच्यात खूप मतभेद होते, ते क्रूर, निर्दयी होते पण ते तसे का झाले याचं उत्तर रावण या कादंबरी तून मिळतं. कादंबरीत पान नंबर ७१ वर एक वाक्य आहे. “कपटाची लढाई कपटान लढलो तरच सहज विजय मिळेल. आज पर्यंत आपल्या जमाती कधीच कपटान लढल्या नाहीत त्यामुळे राज्य गमावून बसल्या”. रावणाने वेदांचा आणि इतर ग्रंथाचा अभ्यास केलता म्हणून त्याला वाटायच की “शारीरिक शक्तीपेक्षा बौद्धीक शक्ती अधिक श्रेष्ठ असते.  म्हणून रावणाने अनेक  प्रकल्प चतुराईने हाती घॆतले, लढाया ही लढला आणि इंद्रालाही पराजित केलं. सर्वदूर राक्षसांच राज्य पसरविणारा हा एकमेव राजा होता.
       काही ठिकाणी कादंबरीत आलेले संदर्भ आजच्याही काळाला लागू पडतात. त्यातील एक म्हणजे “ कोणा एकाला सर्व सुखांची आहुती देवून संघर्षाकरिता रक्ताचा अभिषेक घालावा लागतो. त्यानंतरच त्याचे आप्त, स्नेही किंवा पुढच्या पिढीला स्थैर्य व सुखसमृध्दी मिळते.” हे वाक्य रावणाच्या दूरदृष्टीचे व त्याच्या माणसांच्या प्रेमाविषयीची भावना दाखवून देत. पण जर राज्य उभा करायच असेल तर ज्ञान आवश्यक आहे. आणि ती ज्ञानाची भुक कुटुंबापासून दूर करते. याच्यात अनेक कुटुंबाची वाताहात होते. ते सहन केलं तरच आपलं भविष्य स्थिर असेल नाहीतर दुसरं कोणीतरी आपल्यावर राज्य करेल.
      मानसिक भीती पोटी आर्यांच्या मनात खोलवर गुलामगिरी रुजली आहे. हे जर रावणने सांगण्याचा प्रयत्न केला असता तर तो वैदिक परंपरेचा सर्वात मोठा शत्रू ठरला असता.  आणि तो वौचारिक गुलाम झाला असता ते रावणाला मान्य नव्हत. अविकसित लोकांना गुलाम म्हणून वागवण्यात सध्यातरी देव जमातीला आनंद मिळतोय. विद्धवान आर्य ऋषीसुध्दा मृत्यूयच्या भयान एक प्रकारे वौचारिक गुलाम बनतातच. विद्धवान जेव्हा वौचारिक गुलाम बनतो त्यावेळी तो राजसत्ता आणि धर्माचा गैरफायदा घेतो. आणि त्याच्यासारखेच वौचारिक गुलाम बनवतो किंवा शोधतो.  कोणी नविन विचार मांडला तर धर्माच्या आणि राजसत्तेच्या विरोधात आहे म्हणून त्याला राजव्यवस्थेतून हाकलून दिलं जात. देव जमात बुध्दीमान होती त्यांनी आर्याला याचकाच्या भुमिकेत ठेवलं आणि  स्वता:ची स्तुती करुन घेण्यासाठी बंधने लादली. शेवटी आर्य व आनार्य दोघेही गुलामच राहिली.
     आस्तिक आणि नास्तिक यावरही चांगले विचार यातून पुढे आलेत. नास्तिक म्हणजे तो असतो जो निसर्गान निर्माण केलेल्या जमाती, प्राणी-पक्षी, वृक्ष यांना निषिध्द मानतो. काहीजण तर जन्म देणा-या स्त्रीलाही निषध्द मानतात. निसर्गान निर्माण केलेल्या गोष्टी निषिध्द व अपवित्र ठरवतो, तो नास्तिक होय. नास्तिकपणा हा मानवनिर्मीत धर्म आणि वेदांना न मानण यावरून ठरत नाही.  दुसरं म्हणजे स्वतंत्र्य हे धर्माने किंवा राजसत्तेनं देण्याची काहीच गरज नाही ते तर निसर्ग नियमाचा अविज्यभाग आहे. जन्मताहाच सर्व जण स्वातंत्र्य आहेत पण मानवनिर्मित नियमांमुळे जगण कठिण होत आहे. ज्या धर्माने जागृत समाज निर्माण होत नाही तो धर्म कसला? जन्मावरून प्रतिष्ठा ठरतं असते असं समजणा-या धार्मीक विचारांचा गुलाम जो गुलाम होतो तो अजून माणूसच झाला नाही. निसर्गाचा मूळ आधार आसलेली धर्मसहिंता बनवून माणसांत पेरण म्हणजे माणुस धर्म प्रस्तापित करण होय. बदल हा निसर्गाचा मूळ नियम आहे. म्हणून समानता आणि स्वातंत्र्य मिळेल अशी नवीन संस्कृती रावणाने तयार केली. समानता ही माणसा-माणसात असावी, ज्या धर्मात वर्गवारी जन्माने येते, कर्माने नाही, ते योग्य नाही. वर्गवारी असली पाहिजे पण त्या आधी प्रत्येकाला कर्तृत्व आणि ज्ञानग्रहणाची संधी मिळाली पाहिजे, मगच त्यांच्या बुध्दीच्या आणि क्षमतेच्या मूल्यांवरून वर्गवारि करावी.  हे सारं उभा करण्यासाठी ज्ञानी विचारांची फौज लागते व ते टिकवण्यासाठी विशाल ह्र्दयाचे राज्यकर्तेही लागतात. आणि सर्वात महत्वाच म्हणजे जगण्याचा लढा सांस्कृतिक लढ्यात परावर्तित झाल्याशिवाय मोठं यश मिळूच शकत नाही. व्यक्तीपेक्षा साम्राज्य आणि साम्राज्यापेक्षा संस्कृती महान असते. हे ठरवूनच रावणाने स्वातंत्र्य, सुरक्षितता व समानता ह्या मूल्यांच्या आधारे राक्षस साम्राज्यांचा पाया रचला.
    दुस-यांचा अदांज घेण्यासाठी वापारलेली चाल ब-याचदा आपलाच अंदाज घेण्यास दुस-याला फायदेशीर ठरते. याच बेरजेचं गणित रावणाने अनेक लढायात लावली. स्वार्थीपणान, लाचारीन किंव भीतीन आपल्याला कुणी मोठेपणा देत असेल तर तो दिर्घकाळ टिकत नसतो. अशा लोकांवर फार विश्वास ठेवायचा नसतो, अशा प्रकारच्या स्तुतुची भुरळ पडली तर घात निश्चितच असतो. रावणाच्या चिंतनातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौज तयार करत असतो. एका विशिष्ट काळात किंवा विशिष्ट परिस्थितीत धर्माचे नियम बनवले जातात. कालानुरुप त्या नियमांमध्ये बद्द्ल झाले नाहीत तर त्या विचारांना ढोंगी लोक शाश्वत सत्य मानतात. खरं तर शाश्वत असं काहीच नसतं. विचारांमध्ये बदल जसा अपेक्षीत असतो तसाच धर्माच्या नियमातही बदल असलाच पाहिजे. पान नंबर ३०२ वर रावण आणि मेघनाद यांच्यात एक संवाद आहे. त्यात रावणाने दिलेल उत्तर हे आजही लागू पडतं. “हा वारसा उभा करण सोपं होतं, पण तो टिकवण अवघड काम आहे. त्यात परिपूर्ण होण्यासाठी तुला तुझ्या कुवतीशी संघर्ष करायचा आहे. संघर्ष करण म्हणजे केवळ शस्त्र उचलून समोरच्याला पराजित करणं नव्हे. वैयक्तिक प्रतिमा उंचावण हा सर्वात अवघड संघर्ष असतो आणि मेघनाद तो तुला करायचा आहे.” यावरून लक्षात येत की एका बापाची प्रगल्भता किती ताकदीची होती. कादंबरी वाचत असताना असे अनेक प्रसंग आले आहेत. रावणाची पत्नी मंदोदरी ही किती सुस्कृंत विचार करायची हे तीच्या सीतेबद्दलच्या विचारातून लक्षात येत. लंकेत सर्वच राक्षस या विचाराने राहत होते म्हणुनच लंका उभा राहिली होती. मंदोदरी रावणाल म्हणते “राजन, स्त्रीच शील व पावित्र्य हे तिच्या आत्म्यान, विचारांन किंवा प्राप्त अवस्थेवरून नाही ठरवलं जात, तर ते फक्त तिच्या शरिरानं ठरविलं जात.  समाज सीतेचं दुख आणि आक्रोश बघणार नाही, तिच्या भावनेचाही विचार करणार नाही. अपहरण तिच्या चारित्र्यावर डाग लागला आहे. जो आता कधीच पुसून निघणार नाही. जो आपल्या मुळं झालं आहे.  राजन राजकिय डावपेचात कोणीही जिंकत असेल, पण पराजय मात्र कायम स्त्रीचाच होत असतो. तो पराजय शूर्पणखा व सीता या दोघींमध्ये दिसत आहे”. या पध्दतीने लेखकाने त्या कालखंडातील घडलेल्या घटनेचा मागोवा घॆतला आहे. जो सध्याच्या परिस्थितीत लागू पडतोय.        
         कादंबरीचा शेवट हा रावण व लक्षम्ण यांच्यातील मृत्युच्या अगोदरच्या संवादाने होतो, ते संवाद वाचून रावण किती समजदार आणि महान होता हेच निदर्शनास येत. “लक्षम्णा ज्ञानाची हत्या कोणीही करू शकत नाही. कारण निसर्ग मानव जातील ज्ञान देत आला आहे. त्याच्यावर कोणत्याच धर्माची वा व्यक्तीची मालकी नाही. मी मेलो तर ज्ञान लुप्त होणार नाही, त्यामुळे ज्ञानाची हत्या झाली, हा समज डोक्यातून काढ. लक्षम्णा, ज्ञान ग्रहण करण्यासाठी आधी निसर्गाशी एकरूप होणं गरजेच आहे. त्याचबरोबर स्वत:शी संवादही महत्वचा आहे. स्वत:शी केलेला संवाद ज्ञानाच्या कक्षा रंदावतो. कोणतही ज्ञान अंतिम नाही. चिकित्सक वृत्तीन ज्ञानग्रहण केलं, तर जरासं ज्ञानही जीवनात प्रकाश बनून जीवन तेजोमय करत”   हा संवाद पुढं बराच वेळ सुरू राहतो. लक्षण म्हणतो, “गुरूवर्य, माझ्याविषयीचा राग व व्देष विसरून शत्रूलाही ज्ञान देण्याचं आपलं औदार्य बघून मी कृतकृत्य झालो. आपण तीन्ही लोकांमधील श्रेष्ठ गुरू आहात.”  पुढं प्राण कंठाशी येतो आणि राक्षसी साम्राज्य सोडून जावसं वाटत नसताना, रावणाचा प्राण निघून जातो. कादंबरी वाचत असताना मानवी दृष्टीकोनातून जर याच्याकडं पाहिलं तर अनेक गोष्ट मनला पटतात आणि लेखकाने ज्या पध्दतीने शैली वापरलीय ती अत्यंत भेदक आहे. त्यामुळे कथानक शॆवट पर्यंत वाचनीय झालं आहे.  

Monday, August 26, 2019

“अंगावरच्या कपड्यांवर आलेल्या युवकाच्या कंपनीची करोडो रुपायांची उलाढाल आणि १०० बेकार युवकांच्या हाताला दिलं काम”




(नौकरी करता करता बनला उद्योजक आणि बेकार युवकांना दिली नौकरी)

      अंगावरच्या कपड्यानुसार गाव सोडलं. पुण्यात आला. शिक्षणाची पदवी सोबत होती. मग सुरू झालं या दारावरून त्या दारावर नौकरी मागण. पण कोणी नौकरी देत नव्हत. बीसीए ची पदवी असूनही म्हणावी तशी नौकरी मिळाली नाही. मग फायनान्स मध्ये एका कंपनीत काम मिळालं. मिळालेल्या संधीच सोन करायचं म्हणून पडेल ते काम करायला सुरू केली. गावाकडचा गडी असल्यामुळे शारीरीक कंटाळा कधीच नव्हता. मानसिक थोडाफार त्रास व्ह्यायचा पण हार मानली नाही. कामाचा दर्जा सुधारला, नविन गोष्टी शिकून घेतल्या त्यामुळे कंपनीत सर्वजण कौतुक करयला लगले त्यातुनच पुढे पगार वाढ झाली. कंपनीतल्या वरिष्ठ अधिका-यांनी कामाचं कौतुक केलं. त्यामुळे या गड्याचा आत्मविश्वास खूप वाढला. काही दिवसांतच स्वता:च स्थान निर्माण केलं. पण सतत वाटू लागलं की आपण काम करतोय पण आपल्या मनाला त्या कामातून समाधान मिळतं नाही. आपण स्वता:चा व्यवसाय सुरु करावा. आसं मनातल्या मनात वाटत होतं. पण लगेच धाडस करता येत नव्हत. घरी चर्चा केली पण मार्ग निघत नव्हता. तसचं काही दिवस काम करत राहिले. आता मात्र पगार वाढून लाखरूपाया पर्यंत पोहचला होता. त्यामुळे घरच्याना वाटत होतं की नौकरी सोडू नये कारण सर्व काही व्यवस्थित झालं आहे.
      पण त्यांचं मन त्यांना काय स्वत बसू देत नव्हत. मग ठरवलं इव्हेंट कंपनी सुरू करायची आणि एका राहात्या खॊलीत दोघांना बरोबर घॆऊन टोटल इव्हेंट कंपनीची स्थापना २०१४ मध्ये केली. आज कंपनीचा करोडो रुपायात टर्नओव्हर आहे आणि १०० पेक्षा जास्त युवकांच्या  हाताला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काम मिळवून दिलयं ते गणेश वाघमारे यांनी. आज ते टोटल इव्हेंट कंपनी च्या माध्यमातून बॅंकीग, फायनान्स, आयटी, एज्युकेशन व अनेक कॉर्पोरेट कंपनीच इव्हेटं मॅनेजमेन्टंच काम करतात. शिवाय आपल्याकडे लग्नाचं व्यवस्थापन करूनही करोडपती होता येत हेच गणेश वाघमारेनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं की हे पाच वर्षात कसं शक्य झालं. तर ते म्हणतात, “कोणतीही आर्थिक मदत नव्हती, उद्योग सुरु केला त्यावेळी स्वत:हा जवळ सेव्हीग्जं केलेले थोडेफार पैसे होते. त्याच्याच जिवावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि आज ह्या व्यवसायात पाय रोवला आहे”.
      कोणत्याही प्रकारचा कोणाचाही आधार नसताना एखाद्या उद्योगात उतरून आणि तो यशस्वी करून दाखवण खूप कठीण काम आहे. पण गणेश वाघमारेंनी हे आत्मविश्वास, चिकाटी, संवाद कौशल्य, व्यावाहारिक चातुर्य, सातत्य व सहकार्याची भावना याच्या जोरावर हे सिध्द करून दाखलं की तुम्ही कोणताही व्यवसाय निवडून स्वता:च्या हिमत्तीवर यशस्वी करु शकता. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला उत्तर म्हणजे तरुणांनी आपापल्या परीने रोजगार निर्माण करावा व बेकार तरूणांना रोजगार द्यावा. तरच बेरोजगारी कमी होईल.
      यासंर्दभात गणेश वाघमारे म्हणतात की, “युवकांनी या व्यवसायात उतरावे, अडचणीच्या वेळी आम्ही मदत निश्चित करू. सुरवातील वेन्डर म्हणूनही आमच्यासोबत काम करता येईल, त्याच्यासाठी मार्गदर्शन करू”. “या व्यवसायात स्टेज व्यवस्थापनापासून ते सेलिब्रिटी मॅनेज करण्यापर्यंतच काम असतं. साध्या जेवणापासून ते पंचतारकंती पंचपक्कान्न पर्यंत सेवा पुरवाव्या लागतात. छोटा मंडप ते भव्यदिव्य पेन्डॉल उभा करण्यासाठी खूप काम असतं. मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, सांस्कृतिक, राजकिय, कॉर्पोरेट आणि इतरही अनेक प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेन्ट करण्यासाठी येत्या काळात खूप मोठी संधी आहे. हे काम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. ज्यांच्याकड कौशल्य आहे ते खूप चांगल्यापध्दतीने काम करून अर्थार्जन करू शकतात.” असं वाघमारेनी सांगितलं. ज्यांना इंव्हेटं व्यवस्थापनाची आवड आहे त्यांनी त्यांच्या आवडीचं रुपांतर व्यवसायात करून नविन वाट निर्माण करण्यास तयार व्हावे.       

ज्ञानेश्वर जाधवर

(यसन कादंबरीचे लेखक-९६५७९८५९३५) 


Tuesday, August 20, 2019

“पश्चिम महाराष्ट्राच्या आश्रू पुसायला विदर्भ हजर”






(सांगली कोल्हापुराला महापुरानं कवेत घेतलं, होत्याच नव्हतं झालं, महापुरासोबत आश्रूंचा पुर वाहू लागला, आश्रू पुसण्यासाठी सारां महाराष्ट्र पुढं आला.. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हा भावनिक संवाद...)

पश्चिम माहाराष्ट्र: आता काय खरं नायSSS रांडच्या, पंचगंगेच पाणी वरचेवर वाढतच चाललय.. तिकडं कृष्णा नदीन बी पाय पसारलाय, काय तरी करायला पाहिजे मर्दा..

विदर्भ: अ बेSSS थोडा धिर धर ..

प.मा: ये मर्दा, आरं आत्ता मातर पाणी नाकातोंडात चाललय आमच्या.. जगू की मरू? सांगता येत नाय?

विदर्भ: काळजी नकू करू बे, काय व्हत नाय..
(बोलणं सुरू असतानाच पुरांच पाणी वाढत आणि महापुर येतो. सारी गावं, सांगली, कोल्हापूर पाण्यात जातं)

प.मा : काय कसं व्हत नाय मर्दा, आयुष्यभर जपलेलं सारं वाहून गेलं पाण्यात.. (आणि पाणी रडायला लागंत)

विदर्भ: अ बे, रडु नकू, म्या हाय तुझ्या सोबत.. (असं म्हणुन विदर्भ पश्चिम माहाराष्ट्राच्या आश्रू पुसाया लागतो)

प. मा: आरं मर्दा, तू हाईस तरी कोण?

विदर्भ: अ बेsss म्या “माणूस” हाय. आन त्वा बी माणुसच हाईस.. माणसांन माणसाला मदत करायची नाय तर कोण करणार.. गप्पं आता, पुसं बरं ते डोळं.. मर्दा सारख पुन्हा उभा राहयच.. ( आन दोघं एकमेकांना बघून गहिवरतात)


(टिप: विदर्भातील महेश पवार हे स्वमिनी संघटनेच्या माध्यमातून हजारो दारूच्या आहारी गेलेल्या कुटंबाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. घरात काही नसणं आणि घरच वाहून जाण यामुळे होणारं दु:ख प्रचंड असतं. हे जाणून महेश पवार आणि त्यांच्या संघटनेने पुरग्रस्तानां ट्रकभर अन्नधान्य, कपडे, खेळणी आणि इतर घरगुती उपयोगी पडतील अश्या वस्तू स्वत:हा त्यांच्या कार्येकत्यांसमवेत भेटून दिल्या आहेत.)   

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts