या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मानसूनचा पाऊस जुन महिन्याच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला झाला. त्यामुळे शॆतक-यांनी जून महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून पेरणी करण्यास सुरवात केली. जसं पेरण्याचा काळ सुरू झाला तसं शेतक-यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली. त्यावेळी काही शेतक-यांना महाबीज बियाणे मिळाली नाहीत म्हणून पर्यायी कंपनीचे बियाणे विकत घॆतली. त्यातही लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजी करून बियाणे चढ्या दराने विकण्यात आली.
शेतक-यांनी जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करून पेरणी केली पण पेरलेली बियाणे उगवलीच नाहीत. यात विशेषकरून सोयाबीन उगवलच नाही. सोयाबीनच्या बियाणाची एका पिशवीची किंमत २४०० रूपये पासून सुरू आहे. त्यात काही कंपन्यांच्या २५००, २६०० तर काहीच्या ३००० रुपये पर्यंत विकल्या जातात. साधारणत: एक एकर क्षेत्रासाठी एक पिशवी व पन्नास किलो खत वापरलं जात. एक एकर क्षेत्राचा पेरणीचा खर्च बियाणे २४०० रूपये अधिक खत १३०० रुपये अधिक पेरणी भाडे १५०० रुपये मिळून एकूण ५२०० रुपये असा ढोबळमानाणे खर्च येतो. याशिवाय शॆतातील मशागत व बाजारातून बी-बीयाणे आणणे यासह हा खर्च १०,००० रुपये पर्यंत जातो. जर दुबार पेरणी केली तर पिक येऊ शकतं पण पेरणीचा अनावश्यक आर्थिक भार शेतकऱ्यावर वाढतो.
शेतकरी हा पिक येईल व त्यातून कुटुंबाची उपजीविका भागविता येईल म्हणून तिकडे डोळे लावून बसलेला असतो. पण जर त्याच्या जमिनीत पेरलेल बियाणच उगवलं नाही तर तो काय खाईल आणि कसा जगेल? ज्या कंपन्यानी अशाप्रकारचे बियाणे विकले आहेत त्यांनी एकतर झालेला खर्च द्यावा किंवा पेरणी साठी दुसरी दर्जेदार बियाणे उपलब्ध करूण द्यावेत, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. या संदर्भात तालुका प्रशासनाशी संपर्क केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.



























