Thursday, June 25, 2020

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड



       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मानसूनचा पाऊस जुन महिन्याच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला झाला. त्यामुळे शॆतक-यांनी जून महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून पेरणी करण्यास सुरवात केली. जसं पेरण्याचा काळ सुरू झाला तसं शेतक-यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली. त्यावेळी काही शेतक-यांना महाबीज बियाणे मिळाली नाहीत म्हणून पर्यायी कंपनीचे बियाणे विकत घॆतली. त्यातही लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजी करून बियाणे चढ्या दराने विकण्यात आली.
     शेतक-यांनी जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करून पेरणी केली पण पेरलेली बियाणे उगवलीच नाहीत. यात विशेषकरून सोयाबीन उगवलच नाही. सोयाबीनच्या बियाणाची एका पिशवीची किंमत २४०० रूपये पासून सुरू आहे. त्यात काही कंपन्यांच्या २५००, २६०० तर काहीच्या ३००० रुपये पर्यंत विकल्या जातात. साधारणत: एक एकर क्षेत्रासाठी एक पिशवी व पन्नास किलो खत वापरलं जात. एक एकर क्षेत्राचा पेरणीचा खर्च बियाणे २४०० रूपये अधिक खत १३०० रुपये अधिक पेरणी भाडे १५०० रुपये मिळून एकूण ५२०० रुपये असा ढोबळमानाणे खर्च येतो. याशिवाय शॆतातील मशागत व बाजारातून बी-बीयाणे आणणे यासह हा खर्च १०,००० रुपये पर्यंत जातो. जर दुबार पेरणी केली तर पिक येऊ शकतं पण पेरणीचा अनावश्यक आर्थिक भार शेतकऱ्यावर वाढतो.  
        शेतकरी हा पिक येईल व त्यातून कुटुंबाची उपजीविका भागविता येईल म्हणून तिकडे डोळे लावून बसलेला असतो. पण जर त्याच्या जमिनीत पेरलेल बियाणच उगवलं नाही तर तो काय खाईल आणि कसा जगेल? ज्या कंपन्यानी अशाप्रकारचे बियाणे विकले आहेत त्यांनी एकतर झालेला खर्च द्यावा किंवा पेरणी साठी दुसरी दर्जेदार बियाणे उपलब्ध करूण द्यावेत, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. या संदर्भात तालुका प्रशासनाशी संपर्क केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

लॉकडाऊन मुळे गावाकडे आलेल्या लोकांची पाण्यासाठी वणवण



        गेल्या १०-१५ वर्षापासून शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले असंख्य मजूर व कामगार आहेत. शहरात कुठेही राहून म्हणजे मिळेल त्या जागेवर झोपडी करून, हाताला मिळेल ते काम करणारा एक मोठा वर्ग आहे. तो शहरात हळू हळू स्थिर स्थावर होत आहे. पण अचानाक आलेल्या कोव्हीड-१९ च्या साथीमुळे उच्चभ्रू, मध्यम वर्गीय यांच्या सोबत कष्टकरी व गरीब लोकांचे आयुष्यही ढवळून निघाले.
       जांच्याकडे काही बचत करून ठेवलेली रक्कम होती त्यांच आयुष्य सुरूळीत आहे. पण हातावरच्या कामाने पोट भरणा-या जनतेच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांची शहरातील जगण्याची साधन बंद झाली. सर्व काम ठप्प झाली म्हणून ते गावाकडे आले.
     यातील कित्येक लोक चालत, सायकल, व मोटार सायकल किंवा ट्रक मध्ये आले होते. गावाकडे आल्यानंतर एकतर सुरवातीला गावात घेत नव्हते. शासनाच्या आदेशानुसार गावात घेऊन शाळेत किंवा घरात क्वारंटाईन करायला सांगितले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर ते त्यांच्या घरात राहण्यासाठी गेले. त्यांची गावात शेती नसल्यामुळे व घर ही जुनाट पडलेलं असल्यामुळे गावात राहण्याची अडचण निर्माण झाली. पण तरीही त्यांनी काहीतरी करून राहण्याची सोय केली. तसही गावाकडे कितीही आर्थिक अडचण असली तरी माणूस उपाशी मरत नाही. पण करोना हा साथीचा आजार असल्यामुळे गावातील माणसं एकमेकांना भेटण व जवळ जाण टाळू लागली. पाण्यासाठी सामूहिक नळावर बंदी घातली. मग बाहेरून आलेल्या लोकांनी विहीरी, नद्या व बारवाहून पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

Monday, June 8, 2020

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत -यसन कादंबरीचे परिक्षण- प्रेमसागर राऊत



#महाराष्ट्र #साहित्य #परिषदेच्या #त्रैमासिक मुखपत्राच्या "#महाराष्ट्र #साहित्य #पत्रिकेत" जानेवारी -मार्च २०२० च्या अंकात #यसन कादंबरीचे प्रा. #प्रेमसागर #राऊत यांनी लिहलेले अभ्यासपूर्ण परिक्षण...
संपादक डॉ. #पुरूषोत्तम #काळे यांचे खूप खूप धन्यवाद...






Saturday, June 6, 2020

“ती” नाही म्हणली म्हणून…..



     सुगंधाच्या लग्नाला जुलैला एक वर्ष पूर्ण होणार होतं. तीचा संसार सुखात सुरू आहे असंच चित्र सर्वांना दिसत होतं. सुगंधा लग्नानंतरच गावात राहाण्यासाठी आली होती. औरंगाबाद सारख्या शहरात जन्मापासून पदवीचं शिक्षण होईपर्यंत राहिलेली होती. पदवीचं शेवटचं वर्ष संपल आणि नात्यातील अविनाश पाटील सोबत वडिलांनी लग्न लावून दिलं. शहरात राहिल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय विचार होता. महाविद्यालयीन शिक्षणामुळे पारंपारीक पध्दती तेवढ्या अंगवळनी पडल्या नव्हत्या. गावाकडे आई-वडिलांचे नातेवाईक होते पण त्यांच्याकडे नेहमी जाण नव्हतं. केंव्हातरीच दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीला तीला जाण्याचा योग यायचा. पण सात-आठ दिवसात जेवढं गाव कळला तेवढाचं तीच्या सोबत होता.

    सुगंधाच्या आईनेही कधी तीला जबरदस्ती केली नाही की तू हेच कर आणि अशीच राहा, तशीच रहा. जरी आई पारंपारिक चाली-रीती पाळत होती तरी.. पण वडिल नेहमी सांगायचे, “मुलीच्या जातीने नेहमी घरातील काम शिकलं पाहिजे. घरातील चाली- रीती शिकून घेतल्या पाहिजे म्हणजे लग्नानंतर त्याचा त्रास होत नाही. नाहीतर सासु-सासरे आणि नवरा यांच्याकडून सतत ऎकावं लागत की हे कर आणि ते करं. तुझ्या आई-वडिलांनी हेच शिकवलं का? तुला काही परंपराच माहित नाही. त्याच्यापेक्षा सर्व गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. सासरच्या कोणाला नाही म्हणायचं नाही. त्यावर सुगंधा म्हणायची, “मी लग्न करून कधीच गावाकडे जाणार नाही.  शहरातीलच नवरा करणार आहे. एवढी पदवी झाली की मलाही नौकरी लागेल. मग मी कशाला गावाकडे जाऊ आणि गावातील परंपरा शिकू?” त्यावर वडिल म्हणायचे, “बाळा, तू गावात राहा नाहीतर शहरात? तुला या हिंदू संस्कृतीतील रितीरिवाज पाळावेच लागतात. तू आता शिक्षण घेतलस म्हणून असं बोलतेस.. पण माझ्याकडे बघ. मी ही सुरवातील असाचं म्हणून गाव सोडलं. आता शहरात स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय. पण अजून तर काहीच हाती लागलं नाही. कंपनीत काम करून एकट्याच्या पगारावर तुम्हां दोन मुलांची शिक्षणं व हा वनबीएचके फ़्लॅट घेतला आहे. या व्यतिरिक्त मी काहीच कमवू शकलो नाही.”


    अशा मध्यमवर्गीय घरात राहिल्यामुळे व औरंगाबाद सारख्या शहरात वाढल्यामुळे सुगंधा जरा अधुनिकतेचे पाढे गिरवत होती. पदवीला असताना तर अनेक मित्र-मैत्रिणी तीला जोडल्या गेल्या होत्या. त्यात अंधश्रध्दा निर्मूलनाच काम करणारे संकेत, राजेश, आशा, स्वाती यांच्या सोबत तर अनेक गोष्टी तीला माहित झाल्या होत्या. ती म्हणायची की माणसाने श्रध्दा ठेवावी पण अंधश्रध्दा बाळगू नये. असं सार आनंदात सुरू असताना सुगंधाला गावाकडंच पाटलांच्या मुलाचं म्हणजेच अविनाशचं स्थळ येतं. वडिलांच्या नात्यातील असल्यामुळे आईही काही बोलू शकली नाही. अविनाशचा इंजिनिअरिंगला मॅनेजमेन्ट कोट्यातून प्रवेश घेतला होता. पण दुस-या वर्षातूनच ईअर डाऊन झाला होता. चार वर्ष तो परिक्षा देत होता पण पास काही झाला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच लग्न करायचं ठरवलं. आणि नात्यातील म्हणजे सुगंधाच स्थळ निवडलं होतं. लग्नातील देवाण-घेवाण, मानपान थोडक्यात बसला होता म्हणून सुगंधाच्या वडिलानी हो म्हणून कळवलं होतं आणि धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला होता.


     या लग्नाच्या वेळी सुगंधा नको म्हणत होती पण शेवटी वडिलांच्या इच्छेनुसार तीला लग्न कराव लागलं. लग्न होऊन ती सासरी आली. म्हणजेच एका खेडे गावात. जिथं आजही नावाला राहिलेले पाटील स्वताला गावचे वतनदार समजतात. गावातील जत्रा व उत्सवाच्या वेळी यांनाच मान द्यावा लागतो. अगदी असचं काल झालेल्या वट सावित्रीच्या सनात सुध्दा.  म्हणजे वडाला पुजण्यासाठी गावतील पाटलाच्या स्त्रीयांचा मान पहिला आहे. त्यांनी वडाला पूजलं की मग बाकिच्या स्त्रीयांनी पूजायचं अशी या गावची प्रथा आहे. आतापर्यंत पाटलाच्या सर्व सुना ही परंपरा पाळत आल्या आहेत. पण नेमक या वर्षी सुगंधाला वडाच्या झाडाला पूजण्यासाठी जायला सांगितलं तर सुगंधा म्हणाली, “मी असले पारंपारिक रितीरिवाज पाळत नाही.” त्यावर सासू म्हणाली, “हे बघ सुगंधा आजपर्यंत पाटलाच्यां लेकी-सुनानी ही प्रथा पाळली आहे. त्यामुळे तुला जावचं लागेल.”  हे ऎकून सुगंधाने जाण्यास नकार दिला. मग सासूने सास-याल सांगितले. त्यांची चर्चा सुरू असतानाच सुगंधाचा नवरा म्हणजेच अविनाश आला. आणि तो म्हणाला, “हे बघ, आई सांगेल तसं कर. आपल्या वाढ्याची प्रथा आहे. गावात आपला मान असतो. सावित्री ही तीच्या नव-यासाठी पूजा करते. त्यामुळे तू ही आपल्या नव-यासाठी जा. ऎक माझं.”  हे बोलत असताना अविनाशचा आवाज वाढला होता. आजपर्यंत सुगंधाने अनेक गोष्टी सासू- सास-याच्या ऎकल्या होत्या. पण आज ही पहिलीच वेळं होती की ती नाही म्हणत होती. त्यावर ती म्हणाली, “अशा पौराणीक कथांवर माझा विश्वास नाही ज्याच्यात विज्ञानाचे पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे    ही प्रथा मी पाळणार नाही.”  अविनाशने हे ऎकताच..तीला मारायला सुरवात केली. “तू नव-याच ऎकत नाही. नव-यासाठी उपास करत नाही. तू कसली बायको आहेस. तू माझी वैरिण आहेस.”  असं म्हणत त्याने जोरात डोक्यात बुक्की मारली. तशी सुगंधा खाली पडली. आणि जमिनीवर आपटली. डोक्यातून रक्त येऊ लागलं. तीची शुध्द हरपली. सासरे घाबरले. लगेच गावातील डॉक्टर कडे नेहलं. तिथं मलम पट्टी केली पण शुध्दीवर आली नाही. मग डॉक्टरांनी मोठ्या दवाखान्यात जाण्यास सांगितले. तिथं गेल्यावर तपासणी केली. पण सुगंधा काहीच प्रतिसाद देत नव्हती. सलाईन लावले, औषधं दिली पण सुगंधा काही बरी झाली नाही. आता ती कोम्यात आहे. माहित नाही. ती बरी होईल की नाही.




लॉकडाऊनच्या नावाखाली शासनाच्या कृषी सेवा केंद्रात खते व बी-बीयाणे विक्रीवरुन मनमानी




       शासनाच्या कृषी खात्याकडून शेतक-यांना बी-बीयाणे व खते बांधावर पोहचवणार असे जाहिर केले होते. पण सध्याची परिस्थिती पहाता शेतक-यांना कृषी सेवा केंद्राकडूनच बी-बीयाणे व खते उपलब्ध होत नाहीत. शॆतकरी कृषी सेवा केंद्रात ये-जा करत आहेत पण कृषी सेवा केंद्राकडून सांगण्यात येत आहे की, “अजून खते आली नाहीत. बीयाणे आलेली संपली आहेत.” असं सांगून अडलेल्या शेतक-यांना परत पाठवलं जात. स्टॉक शिल्लक ठेवून, माल नाही असं जाहिर करून, ऎनवेळी माल बाहेर काढायचा त्यामुळे तरसलेले शेतकरी गर्दी करतात कारण पेरणीचे दिवस संपत आलेले असतात त्यांच्यापुढे बी-बीयाणे व खते मिळेल त्या किमतीत घेण्याशीवाय पर्याय राहत नाही. आणि जे जास्त पैसे देवू शकतील किंवा बीयाणा सोबत खतही घेतील त्यांनाच बी-बीयाणे व खते विकली जातात. खतं व बीयाणे वाढीव किंमतीत घेण्याची जबरदस्ती कृषीसेवा केंद्राकडून करण्यात येत आहे. याच्यात अल्पभूधारक शॆतक-यांची लूट होत आहे. त्यांच आर्थिक शोषण केलं जात आहे. एक तर या वर्षी करोनाच्या साथीत गरिब अल्पभूधारक शॆतकरी मेटाकुटीला आला आहे. काही शॆतक-यांची पीक अवकाळी पावसामुळे वाया गेली. काहींना भाव मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांना शासनाच्या कृषी सेवा केंद्राकडूनच अडचणीत पकडल जात आहे.

     मान्सूनचा पाऊस येण्या अगोदरच अवकाळी पाऊस मुसळधार झाला. त्यामुळे सोलापूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या करण्यासाठी शॆतक-यांनी तिफ़णी उचललेल्या आहेत. पण बी-बीयाणे व खते मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडे फ़े-या माराव्या लागत आहेत. त्या फ़े-या मारण्यातच शेतक-यांची ऊर्जा खर्ची होत आहे.

    कृषी विज्ञान केंद्राच्या अधिका-यांकडून सांगण्यात आलं आहे की,“नियमानुसार कोणतही बी विकताना लिंकेज करता येत नाही. कृषी सेवा केंद्राकडे किती स्टॉक आहे व त्याच्या किंमती काय आहेत. याची माहिती बाहेर बोर्डावर प्रदर्शित करण बंधनकारक आहे. प्रत्येक शेतक-यांना शासनाच्या दरपत्रकानुसार बी-बीयाणे मिळाली पाहिजेत.”

     शासनाची नियमावली कृषी विज्ञान केंद्र चालवणा-यांनी धाब्यावर बसवली आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर कित्येक अल्पभूधारक शॆतकरी पेरणी वाचून वंचित राहतील. या वर्षी करोना महामारीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरिब, कष्टकरी, अल्पभूधारक शॆतक-यांना खरं तर मदतीची गरज आहे. जर त्यांची पेरणी वेळेत झाली नाही तर या शॆतक-यांच पीक येणार नाही. परिणामी ते अजून जास्तच हालाखीच्या परिस्थितीत ढकलेले जातील. याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.  आत्ताच सावध पवित्रा घेऊन, प्रत्येक शॆतक-यांना बी-बीयाणे मिळतील याची दक्षता घॆण गरजेच आहे.  


टिप: बार्शी, कळंब व केज तालुक्यातील शेतक-यांनी सांगितलेल्या माहितीवरून.     

Friday, June 5, 2020

आई-वडिल वारल्यानंतर पाच मुलांच काय होतं?



     अर्धांग वायूचा झटका आलेल्या आईला छोटकी बागी या वॉर्ड मधील पाच मुलं रांचीच्या मोठ्या दवाखान्यात घॆऊन जात होते. आईनं नवरा वारल्यापासून मुलांना जंगालातील लाकडं गोळा करून सांभाळलं होतं. पाच वर्षापूर्वी या मुलांच वडिलांच छत्र हरवलं होत. पण आईने हिम्मत धरून मुलांना आधार दिला होता. ज्या आईच्या मायेखाली ही पाच मुलं वाढत होती, पण अचानक आईचं आजारी पडल्यामुळे ही पाचही मुलं घाबरून गेली. छोटे मोठे प्रयत्न करून शॆजारी-पाजा-यांच्या मदतीने आईला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. पण कोडरमा शहरात इलाज होत नसल्यामुळे आईला रांचीला घेऊन निघाले. १५ वर्षाची मुलगी काजल कुमारी धीर देत होती. ९ वर्षाचा मुलगा सारखा रडत होता. बाकीच्या दोनही मुली पडेल ते काम करून आपल्या आईला वाचवण्यासाठी धडपडत होत्या. सुनिता कुमारी १३ वर्ष व अनिता कुमारी ११ वर्ष. त्यांच शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे असंतसंच होत होतं. त्यांचा थोरला भाऊ १८ वर्षाचा आहे. पण तो वेडसर असल्यामुळे त्या बहिणींना त्यालाही सांभाळाव लागत आहे. दवाखान्यासाठी लागणारे पैसेही नाहीत पण सरकारी दवाखान्यात इलाज होईल या आशेने ते निघालेले.



    आईच्या वेदना वाढतच होत्या. निम्मा रस्ता संपला. त्यावेळी आईला जास्तच त्रास होऊ लागला. गाडीत काही औषधौपचार मिळाला नाही. १५ वर्षाची काजलं आईच्या डोळ्यात बघून आईला धीर देत होती. आई तीच्याकडे बघायची आणि डोळ्यानेचं खुणवायची की माझ काही खरं नाही. माझ्यानंतर या मुलांना तुला सांभाळायंच आहे. असं सांगत आई काजलचा हात हातात घेत होती. तीन तीनदा घट्ट आवळून धरायची. मधूनच तीच्या डोक्यावरून हात फ़िरवायची. असं करतानाचं अचानक तीचे डोळे झाकले जातात. त्यावेळी काजल घाबरून आईला उठवण्याचा प्रयत्न करते. आईला गलबलून हलवते पण आई काही जाग्यावरची उठत नाही की काजल कडे बघत नाही. नातेवाईक जवळ येतो आणि म्हणतो, “काजल मागे हो, आई नाही राहीली या जगात.. आता कोणाला उठवतेस..” हे वाक्य ऎकताच काजलचा हुंदका बाहेर पडतो. काजल रडलेलं पाहून बारक्या बहिणी व भाऊ जवळ येतात.. तेही काजलच्या गळ्यात पडून रडायला लागतात. आता काय करायचं.. आयुष्यात संपूर्ण अंधार दिसू लागतो. आईला गावी परत आणलं जात. अंत्यविधी होतो.



    आई- वडिल गेल्यामुळे काजल आणि हे चार भावांडे अनाथ झाली.. नातेवाईक व शेजारी पाजरी थोडीफ़ार मदत करू लागले. पण या मुलांच शिक्षणचं वय. या वयात यांनी काम करण्यापेक्षा शिकलं तर भविष्य सुधारू शकतं. पण जगण्यासाठी काम तर करावाचं लागणार… अशा स्थितीत असताना ही बातमी कोडरमा जिल्ह्याचे उपायुक्त रमेश घोलप यांच्या कानावर गेली. आणि या पाचही मुलांच्या आयुष्यात आशॆचा किरण निर्माण झाला. स्वत: जाऊन रमेश घोलप यांनी त्यांची नावे शाळेत दाखलं केली. आज त्यातील चार मुलांची कस्तुरबा निवासी विद्यालयात राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. पुढील शिक्षणसाठी त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत महिना दोनहजार शिष्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील अधिका-यांच्या मदतीने तातडीची दहा हजाराची मदत केली आहे. करोना रोगापासून काळजी घॆण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेशन व लागणारे औषध दिली आहेत. ही मदत प्रसंग समजल्यापासून २४ तासात केली आहे.





    या बद्द्ल घोलप म्हणतात, “मला या दुःखद घटनेबद्दल कळले. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. या मुलांसोबत माझे सांत्वन आणि आशीर्वाद आहेत. अम्ही  वेगवेगळ्या योजनांद्वारे मुलांना मदत केली आहे. मी स्वत: देखील अशा कठीण परिस्थितीतून गेलो आहे. अशा परिस्थितींना प्रेरणा समजून या मुलांनी त्यांच्या  पालकांची स्वप्ने पूर्ण करावं.”

            खरं तर अशा प्रकारच्या मदती शासनाच्या पातळीवरून एवढ्या तकडाफ़डकी होतात यावर विश्वासच बसत नाही. पण जर संवेदनशील माणसं असतील तर हे निश्चितच होतं. त्यामुळेच त्या मुलांना आज डोक्यावर छत व पाठीवर मायेची थाप मिळाली.

                                              

Wednesday, June 3, 2020

माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!!



घटना-१
      साखार कारखाना बंद झाल्यावर हरीनाना दरवर्षी गावाकडे जातो. पण या वर्षी त्याला सहजासहजी गावी जाता आलं नाही. कारखाना ५ एप्रिलला बंद झाला. त्या दिवसापासून हरिनाना बीड जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मग काम बंद झाल्यावरही हरीनाना कारखान्यावरच थांबला. लॉकडाऊन मध्ये अडकल्यामुळे थोडीफ़ार मदत मिळाली. त्याचं आणि बायको लेकरांच पोटापाण्याचं भागत होत. पण बैलांना वैरण मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. त्यात एकदा मध्येच अवकाळी पाऊस आला. त्यात कोपीत पाणी शिरलं. होतं नव्हतं ते सामान भिजलं. त्यामुळे अजून अडचणीत वाढ झाली. मग तर कारखान्याकडे हात पसरून दोन वेळंच जेवण मिळवलं आणि कसे तरी दिवस काढत होते. तेवढ्यात शासनाकडून जाहिर करण्यात आलं की जे कारखाने बंद झाले आहेत त्या मजुरांना गावी जाण्याची परवानगी देण्यात येईल. मग हरीनानाचा गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखान्याने एक ट्रक मध्ये पाच गाडीवानाचा पसारा भरला. आणि ते बीड कडे निघाले. रात्रभर प्रवास करून ते गावाच्या जवळ आले. तर गावातील काही माणसांनी त्यांची ट्रक आडवली. आणि म्हणाले की तुम्हांला गावात प्रवेश नाही. हरीनाना आणि इतर लोकांना हात जोडले. पाया पडले तरी काही गावात प्रवेश दिला नाही. त्यांच्यातील एकाने ट्रकवर दगडं फ़ेकायला सुरू केलं. त्यामुळे शेवटी हरीनाना आणि ते गाडीवान गावापासून २ किमी अंतरावर माळावर गेले. तिथेचं सामान खाली करून घेतलं. ट्रक परत गेला. हरीनाना पसारा काडून कोप करू लागला. त्या सर्व गाडीवानानी तिथेच कोपी केल्या. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती की दुसरी काहीच सोय नव्हती. एक किमीवरून २५ ते ३० फ़ुट उपसा नसणा-या खॊल विहीरीतून पाणी काडून वापरू लागली. पण एके दिवशी पाणी काढताना हरिनानाच्या बायकोचा तोल जातो आणि ती विहीरीत पडून जखमी होते. आता ती दोन्ही पायाने आधू झाली आहे.


घटना-२
     अजिनाथ हा गेल्या वर्षापासून मुंबईला एका मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करत होता. लहान दोन मुलं होती. बायको लेकरा सह काम करून कसं तरी जगत होता. अचानक करोनाच वारं सुरू झालं. आणि लॉकडाऊन झालं. त्यामुळे हातचं काम गेलं. २४ मार्च पासून हाताला काम नाही. त्यामुळे गावाकडे जावं तर लॉकडाऊन झालेलं. मग त्यांने १४ एप्रिल पर्यंत वाट बघितली पण लॉकडाऊन काही संपल नाही. जवळचे सर्व पैसे संपले. आता करणार काय? काही दिवस रांगेत उभा राहून जेवण घेऊ लागला. पण त्याच्यातून त्यांची भूक भागू शकली नाही. उपाशी मरू लागले. मग त्यांने त्याच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घॆतला. जायचं कसं? पैसे नाहीत. वाहन सुरू नाहीत. मग तो बायकोसह दोन लहान मुलांना घॆऊन चालत निघाला.  १८ एप्रिलला निघालेला अजिनाथ ३ मे ला त्याच्या गावी पोहचतो. पायी चालत, कधी उपाशी तर कधी फ़क्त पाणी पेवून तो गावाच्या वेशीवर येतो. तिथं त्याला गावातील लोकांकडून आडवलं जात. त्याला गावाच्या बाहेर काढंल जात. त्यावेळी त्याची लेकरं, बायको रडत आहेत. त्याच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. तो म्हणायचा, “सरपंच, आहो, म्या ह्याच गावचा, मला गावात घ्या.. दोन दिसापासून उपाशी हाय.. मला वाटायचं काय बी झालं तरी माझं गाव मला उपाशी मरू देणार नाय. म्हणून आलोय..आम्हांला त्या पडक्या घरात राहू द्या. म्या काय बी काम करीन आन पोट भरीन.. मला तो रोग झालेला नाय.” अजिनाथ विनवण्या करत होता. पण कुणाच्याच काळजाला पाझर फ़ुटत नव्हता. त्याचे आई-वडिल ही विनंती करत होते. पण त्यांच ही ऎकलं नाही. त्यांनाही सांगितलं की तुम्हांलाही गावाच्या बाहेर काढू. शॆवटी गावकरी त्याला गावाच्या बाहेर हाकलून लावतात.  गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ही त्याला गावात राहण्यासाठी आधार देत नाहीत. गावातून बाहेर जाताना तो रडत रडत म्हणत होता.. “आम्हांला पाणी तर द्या.. लय आशेनं आलोय.. खूप तहान लागलीय..” पण कोणी पाणीही दिलं नाही. तो गावाच्या बाहेर जातो. जाताना मागे वळून वळू बघत होता.. आणि डोळ्याचे आश्रू शर्टच्या भाईने पुसत होता. तो गावाच्या बाहेर जाऊन बायको मुलांना फ़ाशी देवून तोही फ़ाशी घेतो.



     हरीनाना आणि अजिनाथ यांना कोणी उधवस्त केलं? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. करोना हा एक साथीचा रोग आहे. तो आज ना उद्या बरा होईल. पण वर्षेन वर्षी गावात जिंवत असणारी माणूसकी लयाली गेली याच जास्त दु:ख होत आहे. हरीनाना व अजिनाथ यांना कोरोना झाला होता का? त्यांच्या तपासण्या केल्या होत्या का? ते कोणत्या अडचणीतून येत आहेत? अगोदरचं त्यांच खच्चीकरण झालं आहे. त्यामुळे त्यांना त्या त्या गावातील स्वता:ला प्रतिष्ठीत समजणा-या व गावाचा कारभार हाकणा-यांनी आधार देण गरजेचं होतं. पण आज घडीला गावा-गावात अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यातून गावातील पूर्वीच्या काळी असणारी माणूसकी नेस्तानाबूत झाली आहे. गावाच गावपण केंव्हाच संपल आहे. शिल्लक राहिले आहेत ते जिवंत मानवी सांगाडे जे फ़क्त पैसा व माणूसकीहीन जिवन जगत आहेत. काही मोजकेच जाणकार लोक समजावून घेवून अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्याकडे सत्ता नाही. त्यामुळे त्यांच कोणी जमू देत नाहीत. आज त्यांची अवस्था म्हणजे नखे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्य गरजेच आहे. आज जे भ्रमात आहेत की गाव एक संस्कृती आहे. गावात सर्व काही आजही शिल्लक आहे. हा पोकळ भ्रम सोडून वास्तव स्वीकारून गावाची पूर्नरचना होणं गरजेच आहे. नाहीतर व्यवस्थेतील सोकावलेले लांडगे हरीनाना, अजिनाथ सारखे असंख्य बळी घेतील. आज हे दिसून आलं ते करोनाच्या निमित्ताने.. पण हे रूजू लागलं.. याच्यावर वेळीच घाव घालण आवश्यक आहे नाहीतर करोना पेक्षाही महाभयंकर हा रोग आहे.  


Monday, June 1, 2020

पोलिसांच्या आतली बाजू मांडणारी वेबमालिका, “पांडू”




वेब प्लॅटफॉर्म: एमएक्स प्लेअर वर रिलिज झालेली मस्त मालिका..

     पोलिस दिसला की लांब पळून जाणारे आजही कित्येक लोक गावा-गावात आहेत. तसे पोलिंसा समोरून चोरी करणारे लोक ही आहेत. यात दर वेळी पोलिस सारखाच असतो असं नाही. काही वेळा तो त्याच्या आतल्याला जागा करतो.       
     चित्रपटात पोलिसांची प्रतिमा ही वेगवेगळी पहायाला मिळते. त्यातही  हिंदी सिनेमात सामान्यत: पोलिसांच्या दोन प्रकारांचे वर्णन केले आहे - दबंग मालिकेतले चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम पण मराठी वेब सीरिज पांडू मुंबई पोलिसांची आतली बाजू दाखवत आहे. खरा पोलिस आमच्यासारखा माणूस आहे. त्याला आपल्या मुलास आणून त्याच्या पालक-शिक्षकांच्या सभेला जायचे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अनेक मानवी बाजू आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.


       या मालिकेचे दिग्दर्शक सारंग साठेये अनुषा नंदकुमार यांनी  तर   लेखन नोएल कॉर्डिरो, ओंकार जाधव आणि गौरव पवार यांनी केलं आहे. तर सुहास शिरसाट, दीपक शिर्के, तृप्ती खामकर, प्रसाद रेड्डी, अबिश मॅथ्यू, गिरिजा ओक आणि सारंग साठे यांनी याच्यात अभिनय केला आहे.


     ‘पांडू’ अतिशय हलक्या मनाचा, सधा सरळ मार्गाने जगणारा माणूस हा मुंबई पोलिसांत आहे. तो इथं प्रत्येक प्रसंगात माणूस म्हणून जाणवतो. कोणत्याही चेतावणीशिवाय त्यांचे जीवन कसे धोक्यात आहे आणि कोणत्याही वेळी आपत्ती घडू शकते हे देखील आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगातून जाणवते.


       सुहास शिरसाट आणि ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के दोघेही आपापल्या भूमिकेत उत्तम काम करतात. सुहास शिरसट यांचा सहज सुंदर अभिनय प्रक्षेकांना खिळवून ठेवतो. दिपक शिर्केंचा “गुगुल मावशी” पासून सुरू होणारा संवाद सतत ऎकावासा वाटतो.. मुख्य भूमिकेतील पात्रांचे खाजगी-कौटुंबिक जीवन या मालिकेतदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते जिवन जगत जगत ते छोट्या मोठ्या लढाया लढत असतात. हेच या मालिकेत ठळकपणे आले आहे. मालिकेत अधून मधून असणारे विनोदाचे मिश्रण नैसर्गिक वाटते. सोबत सर्व सहकलाकारांचे अभिनय ठिक आहेत.

     दिग्दर्शनास तांत्रिक किंवा नेपथ्याच्या मर्यादा आल्यात असे जाणवते. पण कथेत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात व पडद्यावर दृश्य नैसर्गिक करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. पटकथा अजून आखडता आली असती कारण काही ठिकाणी अनावश्यक वाढल्याचं दिसतं. संगीत ठिक आहे. चित्रीकरण व संकलन ही उठावदार आहे.
एकंदरीत मराठीत एवढा चांगला प्रयत्न करून मांडलेली पोलिसांच्या जीवनावरील वास्तव व भावनिक गोष्ट पांडू मधून पुढे आली आहे. नक्की पहावी अशी ही वेब मालिका…



Director: Anusha Nandakumar & Sarang Sathaye
Writer: Noel Cordeiro, Omkar Jadhav & Gaurav Pawar
Cast: Suhas Shirsat, Deepak Shirke, Trupti Khamkar, Prasad Reddy, Abish Mathew, Girija Oak & Sarang Sathaye
Web Platform: MX Player


Friday, May 29, 2020

विवेकाचा आवाज बोलणारी कादंबरी- डॉ. दत्ता घोलप (समिक्षक)





- विवेकाचा आवाज बोलणारी कादंबरी- डॉ. दत्ता घोलप (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)

 "गरिबीचं भांडवल न करता नेटाने लढणारा नायक यसन मध्ये जाणवतो."

-"मराठी साहित्यात पहिल्यांदाच असं घडतयं की कथेतील नायक जन्माला येण्याअगोदर पासून बोलायला सुरु करतो.”

Saturday, May 23, 2020

जीवन म्हणजे सारं काही....... (Life means Everything...)


      “पाहाटेचा गार वारा, मंद प्रकाश, हळू हळू लालसर, व नंतर तांबूस होत जाणारा सूर्य जो एखाद्या नदी किनारी वर येताना पाहताना मन प्रसन्न वाटायला लागत. काही क्षणातच पांढ-या शुभ्र पक्षांचा थवा उडतो. ते पाहून तर अजून आनंदायी वातावरण होत…” हे दृश्य आहे “जीवन म्हणजे” या नुकत्याच यूट्य़ूब वर रिलिज केलेल्या गाण्यातील. देवयानी मुव्हीज प्रोडॉक्शन हाऊस ची निर्मीती असलेलं, सपट परिवार चाय ने इनिशेटीव्ह घेतलेलं व भारती चाटे-नाटेकर यांनी दिग्दर्शीत केललं हे गीत आपल्या सध्या हा प्रत्यक्ष अनुभव देत आहे. त्यामुळे सध्याच्या घुसमटीच्या वातावरणात नक्की पहा हे गीत.. जरासं.. मनाला हलंक वाटेल..

 

       सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे. पण तरीही संधी साधून  बाहेर पळणारे काहीजण आहेतच. खरं तर माणसाला असं बंदिस्त जीवन जगण्यास खूप अवघड वाटतंय कारण मानवी स्वभावानुसार त्याला मोकळ्या निसर्गात श्वास घेण्याची सवय आहे. पण आता किती दिवस कोंडूनच श्वास घ्यावा लागेल हे काय सांगता येत नाही. त्यामुळे याच वातावरणात कलाकारांनी स्वता:ची कल्पना शक्ती वापरून आपापल्या घरी छोट्या व्हीडीओ क्लिप,  एकपात्री, काहीजण लिखाण करत आहेत, तर कोणी गाणी तयार करत आहेत. त्यातील एक म्हणजे भारती चाटे-नाटेकर यांनी “जीवन म्हणजे” हे गीत दिग्दर्शीत केलं आहे, तर आशिष नाटेकर यांनी निर्मीती केली आहे. हे गीत दिपक अंगेवार यांनी लिहलं असून निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. निहार शेंबेकर, संगिता शेंबेकर, व किरण शेंबेकर यांनी हे गीत गायलं आहे. त्यांच्या आवाजात एक जादू असल्या सारख वाटतं कारण आपोआपच ताल धरायला आपण सुरू करतो. मिक्सींग व मास्टरींग आनंद डाबरे यांनी तर संकलन अभिजित कुंदर यांनी केलं आहे.

 


    जीवन म्हणजे सारं काही.. या शब्दांसोबत ताल धरतात ते.. अभिनेते देवदत्त नागे, संर्कषण क-हाडे, व अभिनेत्री प्राजाक्ता गायकवाड आणि अश्वीनी कासार.. यांच्या गीतातील संगीताच्या तालावर होणा-या हालचाली लयबध्द आहेत. असं वाटतं की हे सर्व एकत्र येवून नृत्य सादर करत आहेत.. त्यांच्या चेह-यावरचे भाव व गीताचे बोल.. जीवानातील आशा जागृत करतात..

खाली.. या गीतची लिंक दिली आहे.. नक्की पहा… मनाला मोकळं वाटेल..

For Brand: Sapat Parivar
Production House - Deoyani Movies Pvt Ltd.
Director - Bharti Natekar
 Producer - Ashish Natekar
Lyrics - Deepak Angewar
Music - Nihar Shembekar
Mixing & Mastering - Anand Dabre
Singers - Nihar Shembekar, Sangeeta Shembekar, Kiran Shembekar
Editor - Abhijeet Kundar
Actors: Mr. Sankarshan Karhade, Mr. Devdatt Nage, Ms.Prajakta Gaikwad and Ms. Ashwini Kasar.

खाली.. या गीतची लिंक दिली आहे.. नक्की पहा… मनाला मोकळं वाटेल..





----------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation:

“The cool breeze of the morning, the faint light, the faint redness, and then the reddening sun that came over the riverbank made me happy. In a few moments, a swarm of white birds flies. It is even happier to see it. ”This is the scene from the song" Jeevan Mein "which was recently released on YouTube. The song is produced by Devyani Movies Production House, Initiative by "Sapat Parivar Tea" and directed by Bharti Chate-Natekar. So, in the current intrusive environment, be sure to watch this song .. a little bit .. the mind will feel overwhelmed ..

       During the current lockdown, everyone is locked in the house. But there are still some who run out of opportunities. In fact, it is very difficult for a human being to live such a closed life because according to human nature, he has a habit of breathing in the open nature. But now it is not possible to say how many days it will take to breathe. So in this environment, artists are using their own imagination to create short video clips, solo, some are writing, some are creating songs in their own homes. One of them is the song "Jeevan Meinhe" directed by Bharti Chate-Natekar and produced by Ashish Natekar. The song is written by Deepak Angewar and composed by Nihar Shembeker. The song is sung by Nihar Shembeker, Sangita Shembeker and Kiran Shembeker. There seems to be a magic in their voices as we automatically begin to keep pace. Mixing and mastering has been done by Anand Dabre while compilation has been done by Abhijit Kundar.

     Life is everything .. They keep pace with these words .. Actors Devdutt Nagy, Sankarshan Ka-Hade, and actresses Prajakta Gaikwad and Ashwini Kasar .. The movements in the song are rhythmic. It seems that all of them are coming together and performing dances .. The expressions on their faces and the lyrics of the song .. awaken hope in life ..


Wednesday, May 20, 2020

“जिथं धर्मग्रंथ कमी पडतात तीथं यसन कादंबरी उतारा ठरू शकते. कारण साहित्याच्या सर्व पातळ्या पूर्ण करणारी साहित्यकृती..” डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष)


यसन कादंबरीच्या प्रकाशनला आज वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात अनेक वाचक, लेखक व समिक्षक यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया..



“जिथं धर्मग्रंथ कमी पडतात तीथं यसन कादंबरी उतारा ठरू शकते. कारण साहित्याच्या सर्व पातळ्या पूर्ण करणारी साहित्यकृती..”
        डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल्लन)



“यसन ही वास्तव व मानवतावादी कादंबरी..”
                           -डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

“ग्रामिण साहित्यातील एक समृद्ध कादंबरी यसन ”- जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे

“मानवी जगण्याची मानसिक घुसमट मांडणारी यसन” - परिक्षण- रसिक, दै.दिव्यमराठी
 मा. आनंद विंगकर (लेखक व समिक्षक, कराड)

“ग्रामिण ऊस तोड मजूर, त्यांचे जिवन, त्यांच्या श्रध्दा-अंधश्रध्दा व त्यांचा भवताल याचा जिंवत अनुभव देणारी कादंबरी. सोबतच आजच्या पिढीच्या शेतकरी मजूरांचा जागतिकरणात भयावह जीवनसंघर्षाची जाणीव होते.” – परिक्षण – संवाद, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई
-मा. उमेश मोहिते (समिक्षक, बीड)

शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी धडपडणारा नायक आणि शब्दरूपी वळीवाच्या सरीनी वाचकाच्या भावना रूपी मळभाला रिंत करून देणारी नितांत सुंदर कलाकृती म्हणजे यसनआहे.
- परिक्षण- सप्तरंग- दै. सकाळ (प्रा.लोंढे विजय हरिभाऊ, पुणे)

“ऊसाच्या फ़डात जन्मणा-यांसाठी यसन कादंबरी आशेचा किरण” – दै. लोकसत्ता

“ऊसतोड कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी वैशिष्टेपूर्ण कादंबरी”- ललित (२०१९), मुंबई


“विवेकाचा आवाज बोलणारी ही कादंबरी आहेच शिवाय मरठी साहित्यात पहिल्यांदाच असं घडतयं की कथेतील नायक जन्माला येण्याअगोदर पासून बोलायला सुरु करतो.”
- डॉ. दत्ता घोलप (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)



“अर्धा कोयता कसा तयार होतो आणि मुलांच शिक्षण संपत हे भयान वास्तव मांडणारी कादंबरी..”
-मा.विश्वास वाघमोडे (खास प्रतिनिधी, इंडियन एक्सप्रेस, मुंबई)

“जगण्यासाठी वेगळ्या वाटा शोधणारा यसन मधील नायक प्रेरणा देवून जातो”
                                -मा. अरूण खोरे (जेष्ठ लेखक व संपादक, पुणे)


“समाजातील शेवटचा माणूस नायक होऊ शकतो हे यसन मधून जाणवलं”
            -मा. शरद तांदळे (लेखक व उदयोजक, बीड)



“बोलीभाषेचा गोडवा असणारी अस्सल ग्रमिण ऊसतोड मजूरांच चित्रण मांडणारी एकमेव कादंबरी”
 -डॉ. बबन जोगदंड (संशोधन अधिकारी, यशदा, पुणे)


“मातीतील माणसांना सन्मानाने जगायला वाट दाखवणारी मराठी साहित्यातील ऎतिहासिक कादंबरी ज्याचा प्रकाशन सोहळाही ऎतिहासिकच होता.”
-मा. रमेश घोलप (जिल्हाधिकारी, झारखंड राज्य) 


“वंचिताच्या जगण्याचा अनुभव देणारी व सहनशीलता शिकवणारी कादंबरी”
-प्रा. विश्राम ढोले (माध्यम व संज्ञापन विभाग, सावित्रीबाई फ़ुले पुणे विद्यापीठ, पुणे)   

“वंचितांच्या सार्वत्रिक शोषणांच्या आयामांचे आधोरेखन करणारी ‘यसन’ ही कादंबरी जागतिकिकीरणानंतर सामाजिक-सांस्कृतिक मूल्य-हासाने पारंपारिक शोषणाच्या बदलत्या केंद्राच्या संदर्भातून मानवी जगण्याची घूसमट मांडते. उपेक्षित समूहाच्या जगण्याच्या हक्कासंदर्भात लोकशाही व्यवस्थेतील कल्पनेपलीकडच्या अवकाश रेखाटत असल्याने महत्त्वाची कादंबरी ठरते.”
-प्रा.प्रेमसागर राऊत, बार्शी

एक मुरलेला चित्रकार जसे हळूवार हाताने चित्र बनवतो तशीच ग्रामीण भाषेत लिहलेली ही कादंबरी. ज्यांनी कोणी आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे त्याला ही कादंबरी आपलीच कथा सांगत आहे असं आपसूकच वाटून जात.” –  सत्याग्रही (ऑगस्ट-२०१९)
-प्रा. हुसेन शेख (एमआयटी, पुणे)

आयुष्यात धडपडणा-या संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जगण्याचा पट अनुभवण्यासाठी ही कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे अशी निंतांत सुदंर साहित्यकृती आहे.
दै. पुण्यनगरी  -प्रा. प्रदिप सुरवसे, जालना


धन्यावाद सर्व वाचकांचे ज्यांनी यसन कादंबरीवर भरभरून प्रेम केलं आणि इथून पुढं ही करत राहतील.. यसन वर आठरा परिक्षण व टिपणं विविध वृत्तपत्र व मासिकात आले. शिवाय दोन विद्यापीठात पी.एच.डी साठी संशोधकाने कादंबरी निवडली आहे.  



सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts