Monday, March 30, 2020

खंत वाटतेय!




         काल सकाळी किराणा आणि भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. खरं तर १० दिवसापासून बाहेर गेलोच नव्हतं. भाजीपाला संपला होता. आणि काही इतर सामान हि आवश्यक होत. पण तोंडाला रुमाल बांधून गेलो.  रस्त्यावर गेल्यावर माणसांची गर्दी जाणवली. तस बाजारात नेहमीच गर्दी असते. पण अगदी दुपारची वेळ होती. मला वाटलं गर्दी नसेल पण माणस बिंदास फिरताना दिसली.
        एक कोप-यावरच्या भाजीवाल्याकडून भाजीपाला घेतला. आणि किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेलो. माझ्यापुढ एक ४५-ते ५० वर्षाची बाई दुकानदारांला हात जोडत होती.
“ दुकानदार मला पाच किलो ज्वारी आणि एक तेलाची पिशवी द्या.”
त्या बाईने असं म्हनाताचा दुकानदार जोरात ओरडला, “ ओ बाई माग व्हा , मला गिर-हाईक करू द्या . तुम्हाला कालच हाकलून दिलं होत ना , आज पुन्हा आलात तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? उधार माल मिळणार नाही.”
असं म्हणून त्या दुकानदाराने त्या बाईला बाजूला जायाला सांगितल. आणि मला विचारलं काय काय पाहिजे . मग मला पाहिजे ते सामान त्यांन बाधून दिल. सामान घेत असताना त्या बाईकडे माझं दोन-तीन वेळा लक्ष गेलं.
तसा तो दुकानदार म्हणाला, “ आहो, ती बाई दोन दिवसापासून येतेय आणि म्हणतेय कि कामाच पैसे आले कि देते. आता मला सांगा सध्याच्या परीस्थित कोण कोणला पैसं देणार आहे.”
मी त्या दुकानादारां कडे बघत मान डोलावली आणि माझ्या   सामानांच पैसे दिले. आणि बाहेर आलो. थोडावेळ त्या मावशी कडे बघितलं . ती रडू लागली होती. हे बघून मला राहवलं नाही.
जवळ जाऊन त्यांना विचारलं, “ मावशी काय झालाय?”  मावशीने पदराने डोळं पुसत, “काय नाय बाबा , सगळीकडून गरीबाच मरण हाय, दोन दिसापासून सैपाक केला नाय, आन उधार बी कोन देत नाय.”
त्यांच रडण आणि केविलवाणा तोंड बघून कसतरीच वाटलं. परत त्यांना विचारलं , “कुठं राहाताय?” मग त्यांनी हात करून पलीकडे बांधकाम चालू असणारी इमारात दाखवली. मला त्यांचा विश्वास वाटला म्हणून त्यांना पाच किलो ज्वारी आणि एक तेलाची पिशवी घेऊन दिली. आणि त्यांच्या सोबत त्या इमारती कडे चालू लागलो.
 चालत असताना त्यांनी मला विचारलं, “ भाऊ तुम्ही कोणत्या गावाचं?” माझ्याहातातील सामानाची पिशवी सावरत , “बार्शी , सोलापूर”.
लगेच त्या म्हणाल्या, “ आताव, मग तुम्ही गेला नाव्हुत  गावाकडं करुणामुळं. ”
 मी , “नाही”. 
त्या थोड्याश्या काळजीच्या स्वरात , “ आवं जायचं कि गावाकड आई-बाप काळजी करत असत्याल, आवं आम्हाला जायचं व्हतं पण ते बिल्डींग चा मालक कडू मेला , काम करून घेतलय आन पैसे दिना झालाय. आज देतो उद्या देतो असंच म्हणतोय. आता तुम्हीच सांगा कसं करायचं? हाताला काम नाय. काम केलेली मजुरी मिळाली नाय. व्हता तेवढा शिल्लक पैसा संपलाय. आन वरून तो मालक म्हणतोय तुम्ही गावाकडं जावा. दोन महिनं काम बंद राहाणार हाय.  आन गावाकडं जायचं म्हणालं तर ते लॉक डाऊन का फोक्दाउन झालय. आता तुम्हीच सांगा आम्हा गरिबांन काय फाशी घ्यायची का?
त्यांच बोलन ऐकूण कोड्यात पडलो होतो. त्यांच्याकडे बघून फक्त हो हो म्हणत होतो.  तो पर्यंत त्यांच घर आलं होत.  त्यांनी मला घरा कडे बोलावलं पण मी गेलो नाही. बांधकाम चालू असणा-या इमारतीच्या खाली पत्र्याच शेड मारलेल तेच त्यांच घर होत.
तिथून येताना त्यांनीच माझा नंबर घेतला आणि म्हणाल्या, “ भाऊ , कामाच पैसं आले कि फोन करून तुम्हाला देईल.”  मी त्यांना म्हणत होतो राहू द्या मावशी त्याची काही गरज नाही.  
       असं म्हणून मी तिथून घरी आलों. मनातील विचार काही केल्या जात नव्हता. वाटायचं कि आपण जास्त मदत करायला पाहिजे होती. काय काय करायला पाहिजे या विचारात मी दोन तिन मित्रांना हा प्रसंग सांगितला. आम्ही मिळून त्यांना एक महीन्याच राशेन भरून द्यायचं ठरवलं.
      मग मी दुस-या दिवशी संध्याकाळी  त्या शेडकडे गेलो तर इमारतीच्या खाली रिकामं होत . ना तिथ पत्र्याच शेड होतं ना त्या मावशी दिसत होत्या. गेटवर असणा-या वाचमनला  विचारलं कि कुठ गेलेत?
तर तो वाचमन म्हणाला, “ पाहाटच गेली सारी गावाला” मी त्याच्याकडे बघत , “कशी गेलीत?”
त्यांन त्याच्या तोंडावर चा रुमाल सारत , “ गेली असत्याल चालत?”
      वाचमनच हे उत्तर ऐकूण मनाला खंत वाटली. या जगात कोणतीही आपत्ती आली  कि त्याची पहिली झळ कष्टकरी मजूर वर्गाला बसतेय. कोरोनाच्या साथीत सुद्धा हेच घडतंय. शहरातील  नौकरदार, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक सावरतील कसेही पण आज हातावरच पोट असणारा मजूर वर्ग उद्या  जिवंत राहाण्याच्या अपेक्षेने  आज उपाशीच दोन-तीनेशे किलोमीटर पायी चालत त्यांच्या मूळ गावाकडं  निघालाय. कारण त्याना विश्वास वाटतोय कि त्यांचा गाव त्यांना कसही असेल तरी आईसारखा कुशीत घेणार आहे.          
      
ज्ञानेश्वर जाधवर (९६५७९८५९३५)        

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts