Tuesday, December 10, 2019

“शेवटची रक्ताळलेली जिलबी”





त्या वक्ताला लय वंगाळ घडलं. आमच्या गवचा धनाप्पा लय भला माणूस पण परिस्थितीन गांजला. लेकाला आन सुनाला घिऊन कारखाना करत व्हता. धनाप्पान जल्मभर कारखाना केल्याला. त्यातूनच त्यान तीन पोरीची लग्न करून दिल्याली. शेवटचा पोरगा व्हता. त्याच बी लगीन झाल्याल. त्याला तीन वरसाच एक पोरग हाय. त्याच नाव प्रविण ठिवल्याल पन लाडान त्याला प-या म्हणायची.  लेकाच लगीन झाल्यापासून ऊस तोडायच बंद केलं व्हत. पण धनाप्पाच्या बायूकच्या पोटाच आपरेशन झालं. त्याला लय खर्च आला. दवाखान्यासाठी कर्ज घेतलं. ते फॆडण्यासाठी उतारत्या वयात लेकाला आन सुनाला संग घिऊन ऊस तोडायला गाडी लावली.
दररोजच्या प्रमान त्या दिसीबी लवकर उठून फडात गेली. धनाप्पाला वयामुळं काम व्हत नव्हतं पण बळचं आंगात ऊसन आवसान आनून काम करत व्हतं. त्या दिशी बायकून लेकाला आन सुनाला आवडतय म्हनून वांग्याच भरीत करून चिरगुटात भाकरी बांदून दिल्या. नातासाठी दूध गरम करून बाटलीत भरून दिल्यालं. फडात आल्या आल्या धनाप्पान चांगली पात धरून ऊस तोडायला सुरू केलं. लेक बी तोडू लागत व्हता. दोघानी भराभरा गाडीभर ऊस तोडला. पाठीमागून सुन मोळ्या बांधत व्हती. आन ऊसाच वाड्याच भेळ बाजूला काडून ठिवीत व्हती. ऊस तोडून झाला की सारीजन राहिल्याल्या मोळ्या बांधायची. मोळ्या बांधून झाल्यावर सुनबाई तान्या प-याला घिऊन आडूसा बघून पाजू लागली. सासून दिलेल दूध बी प-याला पाजलं. तवर बाप लेकांनी ऊसाची गाडी भरली. दिस आता टक-यावर आला व्हता. जेवायला गाडीतच घिऊ असं म्हणून गाडी हाणायला सुरू केलं. धनप्पाचा लेक म्होरल्या तोडांला बसून ऊसान भरल्याली गाडी हाकाया लागला. फडातून गाडी रस्त्याला लागली की सुनबाईन चिरगुटातील भाक-या सोडल्या. आज सासून वांग्याच भरीत दिलं व्हतं. लय आप्रूप वाटाया लागलं म्हणून म्हनाली,
“ आव आज बघा तुमच्या मायन तुम्हांला आवडतय म्हणून वांग्याच भरीत दिलय”
“ तुला नाय काय आवडत? औ,,,,”
“मला आवडतय पन तुमच्या एवढ नाय, पन जाऊ द्या मायचा लयच जिव हाय बघा तुमच्यावर”
“ आग किती केलं तरी माय हाय ती माझी”
       असं बोलत बोलत तिन सा-यांस्नी भाकरी आन त्याच्या वर वांग्याच भरित दिलं. धनाप्पा गाडीच्या मागच्या बाजूला बसून हातावर भाकर घिऊन येना-या जाना-या वाहानाकडं बघून घास तोंडात कोंबत व्हता. लेकांन बी खायाला सुरू केलं. जर गाडी पळाया लागली तर मध्येच बैलाला दापायचा आन यसन वडायचा. असं करता करता गाडी आता गावाच्या कडाला आली. कोप-यावरच हाटेल बगून लगेच बारक्या प-यान आई कडं बघत,
“आयंव मला दिलबी (जिलेबी) खायचीय”
“ कुथं दिसतीय माझ्या सोन्याला”
हात त्या हाटेलाकडं करत “तोक त्या कोपल्यावल”
जस गाडी कोपरा वलांडून पुढ चालली तसं प-या मोठ्यान वरडाया लागला. आई त्याला गप बसवित व्हती पण तो काय गप बसत नव्हता. आता मातर तो पाय खोडून खोडून रडायाला लागला.
“आयव.......... SSSSSSS..आयवSSSSS, मला दिलबी खायचीय”
“आपून पुन्हा घिऊ, आज ऊशील झालाय”
“नाय मला आजच, घ्यायचीय”
हा आवाज ऎकून प-याच्या बापान झपकन एक रटा मारला तसा प-या जोरात रडाया लागला. हे बघून धनाप्पाला काय राहवलं नाय.
“आर लेकराला मारत असत्यात व्ह्य? त्या मोहरल्या कोप-यावर गाडी थांबव”
“आव सारख लेकराच लाड पुरवून वौताग आलाय नुसता? नाय खाल्ली जिलबी एकांद्यादिसी म्हंजी काय मरतय काय ?”
“आर बट्या तसं नसतय, लेकराचा नाद असतोय, थांबव गाडी म्या घिऊन येतो, माझ्याकड हायती इसीक रुपये”
मग हाटेला म्होरं गाडी थांबवली. धनाप्पा खाली उतरलं आन पावशेर जिलबी घिऊन आलं. गाडीवर चडताच नातवाच्या हातात पुढा दिला. लगेच प-यान पुढा सोडला आन जिलबीचा एक येडा घिऊन,
“आय... तू खा.. धल.. ह्यो चांगला हाय. धल.. धल की”
“बाबा तुला धल.. ह्यो मोता येला हाय, घे”
“आन हे अप्पाला... आप्पा धल्ला तुम्हाला”
प-यानं सा-यास्नी एक एक येडा दिला अन त्यान एक हातात घेतला. खात खात आई कड बघत..
“अप्पाच चांगल हायती”
“आम्ही बी चांगल हाव कीर.. तू बी हाय, पन बाबा थोलाच चांगला हाय”
“ आजून खा”
“ नाय, लाहूदी सांच्याला खायाला, आता बास मला”
नातान दिलेला येडा तोडांत घातला आन धनाप्पा आतल्या आत हसतबी आन रडतबी व्हता. आता गाडी कारखान्याच्या जवळ आली व्हती. पुल वलांडला की कारखानाच व्हता. पण पुलाच्या आगुदर मोठ वळण व्हतं. त्याला उतार बी व्हता. नेमक त्या वळणावर गाडी आली आन मागून ऊसान भरलेला टरक आला. पुढच्या बाजून काही वाहन व्हती. चार पाच ऊसाच्या गाड्या म्होर चालत व्हत्या. मागून आल्याला टरक वेगात व्हता. पुढून आल्याल्या वाहानाला धडक बसलं म्हनून टरकवाल्यान टरक डाव्या बाजूला वळवली तशी धनाप्पाच्य़ा गाडीला धडक बसली. गाडी जाग्यावर पलटी झाली. पुढच्या दोन तीन गाड्या बी आदाळल्या. पण धनाप्पाच्या गाडी मातर दहा मिटर तरी घसरत गेली. बैलांनी मातर मोठ्य़ान डरकाळी फोड्ली. टाहोफोडून माणसं रडतात तसं दोन्ही बैलं मार लागल्या लागल्या वरडली. बैलाला बी लय मार लागला. लेक आन सुन टरकाच्या मागच्या चाकाखाली सापडली. आन चेद्यामेंध्या झाली. धनाप्पाच्या पायावरून ऊसाची गाडी गेली. दोन्ही पायच तुकड पडलं. नातू मातर लांब जाऊन पडला व्हता. त्याच्या हाता जिलेबीचा येडा तसाच व्हता. त्याच्या लेकाच्या तोंडात जिलेबी व्हती. सुनाचा हात खरकटाच व्हता. उरलेली भाकर आन जिलेबीच तुकडं रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं व्हतं. अपघात झाल्या झाल्या कुनालाच काय सुधराना. बाकीच्या ऊसतोड गाडीवानानी गाड्या बाजूला घेतल्या. धनाप्पाला बाहेर काढायाला धावून आली. तवर पोलीस आले. टरक ड्रायव्हरला पकडलं पण त्याच बी पायं मोडलं व्हतं. धनाप्पाला आन त्याच्या लेका सुनाला नातासोबत दवाखान्यात नेहलं. दोन चार दिसांन धनाप्पा सुद्धीवर आल्यावर कळंल की लेक आन सुन जाग्यावरच मेली. नातू जिवंत हाय. पण मुका मार लागला व्हता. धनाप्पाच पाय तर मोडला व्हताच शिवाय मनक्याला मार लागला व्हता. मनक्यातली नस तुटल्यामुळं तो कवाच जोडला जावू शकनार नव्हता. कोन सांगायच पुण्याच्या नायतर मुंबईच्या दवाखान्यात जोडला जातोय पण तो  पाच सहा लाख रूपयेचा खर्च कोन करणार? कुठून आननार एवढा पैसा.? पहिलचं बायकूच्या दवाखान्याच कर्ज फॆडता फॆडता नाकी नव आलं व्हतं.  आन आता हे वाढून ठेवल्यालं. नातू मातर शुद्दीवर आला व्हता. हातपायानी धडधाकट व्हता. धनाप्पाला त्याचच कौतुक वाटायचं. एवढ्या मोठ्या आपघातातून लेकरू वाचलय. म्हणतात ना देव तारी त्याला कोन मारी. तवा पासून धनाप्पा गावातच पांगूळ गाड्यावरून दोन शेरडं हातात धरून ५५ वर्षाच्या बायकूच्या आधारावर नातवासाठी जिव मुठित धरून जगतोय.  स्वता:च्या जिवापरिस नाताला जपतोय. नातानं कवा जिलबी मागितली तर धन्नाप्पा आतल्या आत रडतोय. पण जिलबी खायचं नाव घेत नाय.



हा प्रसंग यसन या कादंबरीतील आहे.

Thursday, November 21, 2019

“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”






“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”

     गोव्यात गेल्यावर जयप्रभू नावाच्या एक प्रमाणिक शिक्षकाची ओळख झाली. ओळख झाल्यावर त्यांनी मला त्यांचे दोन कविता संग्रह दिले ते म्हणजे “लॉग आऊट” व “ठळक नोंदी आणि इतर कविता”. घरी परत आल्यावर रिकाम्या वेळेत सहज त्यांचा ठळक नोंदी आणि इतर कविता हा संग्रह चाळला आणि आवकच झालो. कारण ज्या माणसाने अत्यंत शांतपणे आमचा पाहुणचार केला. बोलताना साधेपणा व कमीत कमी शब्दात मत व्यक्त करणारे जयप्रभू हे कवितेतून सभोवतालच्या एकंदरित परिस्थिती बद्द्ल त्यांचा अस्वस्थपणा अत्यंत मार्मिकपणे टिपतात.  
     या कविता संग्रहात ३९ कविता आहेत. संग्राहाची सुरवात ही “विठ्याची सैर आणि रूक्मिणीचा एकांतवास” या कवितेने होते. विठ्ठल पसार होतो आणि रूक्मिणी शोधायला जाते. पण लवकर काही विठ्ठल सापडत नाही. मग शेवटी वैतागून रुक्मिणी परत येते तर विठठल तिच्या अगोदर गाभा-यात असतो. हे प्रतिकात्म माणसाच जगण आणि जगाच्या शोध घेणं या कवितेतून मनापर्यंत जात. यातील काही कविता थेट काळजाला भिडतात. ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार भिडणा-या कविता आहेत. ज्यांनी विनाअनुदानित, खाजगी कॉलेज, व अनुदानितवर तासिकेवर काम केलं आहे किंवा करत आहेत. त्यांना नक्कीच अस्वस्थ करणारी कविता म्हणजे –
“कवच”
पगार कधी होणार? तिचा जिवघेणा प्रश्न
आणि हॅंग झालेल्या कंप्युटरसारखा असतो तिच्या समोर उभा.
मागणी तसा पुरवठा हे तत्व लागू होत नाही तिच्या आयुष्यात.
तिने केलेल्या कोणत्याही मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत नाही
माझ्या जगण्यातील पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने सांगितलेल्या वेळेत.
म्हणूनच तिने दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे नेटसेटचे कवच आणि
उघडा पडत जातो मी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या प्रश्नाने.
या कविता वाचल्यानंतर जयप्रभू यांच्या विचारांतील प्राणिकपणा जाणवला. खरं तर हल्ली प्रामाणिक माणसाना जगण खूप अवघड झालय. त्यावेळी कथा, कविता, नाटक, चित्र, संगीत या सारख्या कलाच आधार देतात. असचं जयप्रभूंच्या कविता संग्रह वाचल्यावर भासलं. सर्व काही समजतय पण करता काहीच येत नाही. कारण हाताशी काहीच नाही. अशावेळी मनातल्या मनात कलाकृतीच्या माध्यमातून मनाचीच समजूत घालत आयुष्य जगणारे असंख्य कलाकार आहेत. खरंतर साहित्यीक आणि कलाकारांच्या विचारांचा फायदा हा समाजव्यवस्था उत्तम व्हावी आणि टिकून राहावी याच्यासाठी अपेक्षीत आहे. पण हल्ली तसं होताना दिसत नाही म्हणूनच संवेदनशील व अस्वस्थ असणारा माणूस तडफडतोय जगण्यासाठी. हे सारं वास्तव या कवितासंग्राहातून पुढं आलं आहे.
 “बुध्द की युध्द” या कवितेतून तर असं जाणवतय की खरच आम्ही युध्द करणा-या पिढ्या तयार करत आहोत काय? का बरं आम्ही बुध्द मागणारी माणसं घडवू शकत नाही? आमची शिक्षण व्यवस्था कामचलावू आहे का? कि फक्त संवेदनाहीन कारखुन तयार करणारी प्रणाली बनलीय? या शिक्षणाने आम्हाला माणूसपणाची मूल्य शिकवायची सोडून माणसाला उधवस्त करणारी शस्त्रे हाती घ्यायची शिकवलीत. म्हणून आम्हांला बुध्द नकोय युध्द हवय़ का?. पण युध्दाने पुन्हा एकदा जग नष्ट होईल याचा विचारही शस्त्रे हाती घेणा-यांच्या लक्षात येत नाही का? जगभर आज युध्द हवय असं म्हणा-यांची संख्या वाढताना ही कविता डोळ्यात अंजन घालते.
     खरंतर सर्वच कविता विचार करायला भाग पाडतात. संग्राहाच्या शॆवटी “परंपरेचा कासोटा” ही कविता शेवट करते पण तिथून पुढे विचाराला सुरवात होते . या शेवटच्या ओळी-
“आजही
परंपरेच्या कासोट्याला लोंबकळत
समरस होऊन करताहेत, परिवर्तनाची बात”
-    कवी जयप्रभू (गोवा)

Monday, November 11, 2019

ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?



ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?

डोक्यात खूप वर्षांपासून घोळत असलेल्या प्रश्नाच उत्तर चंद्रपूरला ताडोबा अभयारण्यात गेल्यावर मिळाल. प्रश्न तसा साधाच आहे. ताडोबाला ताडोबा का म्हणतात? याच्या अगोदर खूप लोकांना विचारलं होतं आणि तिथही बाहेर असणा-यानां विचारलं होत पण उत्तर मनाला पटेल असं काही मिळालं नाही. मग आम्ही ज्यावेळी अभयारण्यात फिरत होतो. त्यावेळी आमच्या सोबत असणा-या गाईडला विचारलं तर त्यांन सांगितलं की “ताडोबा हा शब्द ब्रिटिंशांच्या उच्चारातून तयार झाला. म्हणजे त्या जंगलात खूप वर्षांपुर्वी अदिवासी राहायचे. त्या अदिवासीपैकी सुरवातीच्या टोळ्यात तारू नावाचा अदिवासी नेतृत्व करत होता. त्याने अनेक निष्पाप अदिवासींचे जंगली प्राण्यांपासून प्राण वाचवले होते. तो कोणत्याही जंगली प्राण्यापासून टोळीच संरक्षण करायचा. विशेष करून वाघापासून तर अनेक जणांना त्याने वाचवलं होतं. पण एकदा तारूवरच वाघाचा हल्ला झाला. आणि वाघाबरोबर झुंझत असताना तो जखमी झाला. आणि त्या हल्यात तारूचा मुत्यु झाला. अदिवासी समाजात आजही एक प्रथा आहे. जर वाघाच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचं स्मारक (समाधी) जंगलात उभा केलं जात आणि नंतर त्या ठिकाणी वर्षाला स्मरण केलं जातं. त्यावेळी तारु हा पालक होता त्यामुळे त्याच्या नावापुढे “बा” हा शब्द जोडण्यात आला. बा म्हणजे मोठा.  मग तारू+बा= तारुबा असा शब्द तयार झाला. आजही  या तारूबाचं छोटसं स्मारक आहे. आज त्याला तिथे मंदिराच स्वरूप दिलं आहे. तिथं दरवर्षी प्रथेप्रमाणे अदिवासींची यात्रा होते. त्यामुळं या जंगलाला तारूबा जंगल असं म्हंटल जायचं.  
    पुढं सतराव्या शतकात ब्रिटीशांनी या जंगलाचा ताबा मिळवला. ब्रिटिंशांना तारूबा हा शब्द उच्चराता येत नव्हता. त्यांनी ताडूबा असं उच्चार केला. पुढं इंग्रजीत तो “TADOBA”  लिहला गेला. पुढं ब्रिटिंशांच्याच कागदपत्रावरून मराठीत हा शब्दा आहे तसा घेताला. आज ताडोबा हा शब्द सर्वांन कडून सर्रास वापरला जाऊ लागला. त्यालाच आपण ताडोबा अभयारण्य असे म्हणतो.  
धन्यवाद मंगेश सर या अत्यंत महत्वाच्या माहिती बद्दल.
धन्यवाद राजाभाऊ आणि उषाताई... आपण खूप व्यस्त वेळातून ताडोबा चा फेरफटका घडवला.


Wednesday, October 2, 2019

सत्य आणि अहिंसेची आज जगाला गरज





या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.”
                                       - महात्मा गांधी

     मला कमाल वाटते बापूंजींची कारण एवढं सारं जगाला देवूनही ते म्हणतात सत्य आणि अहिंसा या जुन्या गोष्टी आहेत. मान्य आहे कि सत्य आणि अहिंसा ही खूप जुनी तत्व आहेत म्हणजे गौतम बुध्दांनी ही हिच शिकवण दिली. पण बुध्दां नंतर जगाला सत्य आणि अहिंसा कुणी शिकवली असेल तर ती माहत्मा गांधी यांनी. हे सांगण्याच कारण म्हणजे मी २००९ साली माहात्मा गांधी यांच साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं सत्याचे प्रयोग (आत्मकथा) हे पुस्तक वाचलं होतं. त्यावेळी पुस्तक खूप आवडलं होतं. पण आज ज्यावेळी मी विचार करतो कि पुस्तकातील काय आवडलं होतं तर ते म्हणजे “गांधीजींचा प्रमाणिकपणा जो त्यांच्या जगण्यातून जाणवतो. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगात गांधी आजूबाजूच्या भवतालाबद्द्ल आणि स्वता:च्या आतील भवताल यांच्यात होणा-या संघर्षाबाबत बोलतात. तो संघर्ष झाला नसता तर कदाचित गांधी सत्य आणि अहिंसे पर्यंत पोहचले नसते. त्या संघर्षातूनच त्यांना बाहेरील जगात जगण्यासाठीच्या संघर्षाची शस्त्रे मिळाली आणि ती म्हणजे सत्य आणि अहिंसा. हे जगासमोर मांडताना त्यांनी स्वता:चा विचार तसा बनवला म्हणून आचार तसाच झाला आणि आचार तसा झाल म्हणून प्रचार आपोआप तसाच झाला. जो जगातील त्या कालखंडातील माणसांच्या ह्रदयात कोरला गेला. आजही तो काही प्रमाणात काहीच लोकांच्या मनात शिल्ल्क आहे.
     सत्यग्रही मार्गाने लढण्याची ताकत त्या कालखंडात गांधींनी बाळगली म्हणूनच आज जग शांततेच्या मार्गाने चालत आहे. अन्यथा १९१५ पासून सातत्याने जगात युध्दजन्य परिस्थिती होती. पहिलं महायुध्द, दुसर महायुध्द, याच्यात प्रत्येक राष्ट्रातील नेता हिंसेवर विश्वास ठेवून लढाई लढत होता. म्हणजे १९४२ ते १९५२ या दशकात तर प्रचंड मोठ्या प्रमाणात युध्दाने मानवी आणि साधनसंपत्तीची हानी झाली आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, रशिया आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांना वाटत होत की दुस-यांचा परावभ केला कि आपण सुरक्षित राहू आणि आपण जगावर राज्य करू. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की कोणतीच राज्य ज्यांनी हिसा केली ती कायमस्वरूपी टिकली नाहीत. जगाला जर टिकून राहायच असेल तर प्रेम, अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरच चालल पाहिजे हे माहात्मा गांधीने ओळखलं. मग गांधीने सत्याग्राच्या मार्गाने लढाई उभा केली. गांधी कोणालच शत्रू मानत नव्हते. त्यांना वाटायचं की जगात जन्मालेल्या प्रत्येकांने प्रेमाने, सत्याने आणि अहिंसेन चाललं तर ईश्वराला (निर्गाला) अभिप्रेत असणारा मानवी समूह तयार होईल.    
माहात्मा गांधी जयंतीच्या आपणास शुभेच्छा!

Saturday, September 28, 2019

“यशानाना बायकोसह आत्महत्या का करतो?”






नुकतीचं वाचनात आलेली कादंबरी “अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट”
लोकवाड:मय गृह प्रकाशित व आनंद विंगकर लिखित कादंबरीने गेली दोन दिवस झालं अस्वथ केलंय आणि विचार करण्यास भाग पाडलय. कारण एखादा माणूस ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी तो फक्त माणूस मरत नाही तर संपूर्ण कुंटूब उधवस्त होतय. नव-याच्या डोक्यात हा विचार आला तर तो बायकोला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडतो, बायको लाहान मुलांना भाग पाडते. का बरं असं होतं असेल? त्यावेळी त्यांना कोणताच जगण्यासाठी आशेचा किरण मिळत नाही का? गावातील, भावकीतील कोणीच कसं त्यावेळी आधाराला धावून येत नाही. मानसिकता एवढी कशी खचते. एकट्या शेतक-याने आत्महत्या करण वेगळ पण सामुहिक आत्महत्या करण म्हणजे ज्याच्या डोक्यात पहिल्यांदा नकारात्मक विचार आला तो व्यक्ती इतर व्यक्तीनां आत्महत्या करण्यास भाग पाडतोय याचा अर्थ दिवसेंदिवस नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढलेलं आहे. कौटुंबीक, सामाजिक नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावेळी ओळखीच्या लोकांची मानसिकता काय असते? नातेवाईक कसे वागतात? गावातील इतर माणसं त्या कुटंबाशी कसं वागतात? आत्महत्या केल्यावर तरी या लोकांची मानसिकता बदलते का? तर.. नाही. हेच या कादंबरीत रेखाटलय.   
     ज्वारी व शाळू काढण्याचे दिवस आहेत. कथेचा नायक यशानाना आपल्या बायको – मुलासह रानात शाळू काढत असतो. अचानक त्या रात्री आभाळ गर्जत आणि अवकाळी पाऊस येण्याचं चिन्हं दिसतं. त्या अवकाळी पावसामुळे कोणी आत्महत्या करतो का? तर वरवर पाहाता कोणीही नही म्हणेल पण ज्याचे आयुष्याच त्या पिकावर आहे आणि ते पिकचं आता पाऊसाच्या पाण्यात वाहून जाणार म्हटल्यावर तो माणूस खचतो तसं यशानाना खचला. कारण घर चालवण्यासाठी घेतलेलं सावकाराचं देणं, पतसंस्थेच कर्ज आणि सातत्याने त्यांना येणार अपयश त्यामुळे त्यांना जगावास वाटत नाही. अजून एक महत्वाचा सामाजिक घटक म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे असतो पण तीनही मुलीच असतात. त्यामुळे यशानाना बायकोवर सारखा चिडायचा व ओरडायचा. त्याच्यातून त्यांच्यात वादावादी व्हायची. त्यातूनच त्यांना नैराश्य येत. पण ते दु:ख पचवूनही संसार करत असतो. मात्र एका टप्प्यावर त्याला हे सारं असाह्य होतं. मुलीनां शिकवतो. थोरली उषा धाडसाने शेतातील काम करत माहाविद्यालयीन शिक्षण घेते. मधवी आशा आणि धाकली नकुशी. नको असताना झाली म्हणून तीला नकुशी म्हणायची. हे सारं कुटुंब यशानाना आणि पार्वती मिळेल त्या कामावर, शेतातील मजुरीवर चालवत असतात. मग अचानक का बरं हे सारं कोलमडत. तर ते अचानक नाही. हे हळूहळू सुरू झालं. पत्येक टप्प्यावरं ते वाढतच गेलं. कधीच त्यांच्या मनासारखं घडलं नाही. त्यांनी त्याच्या नौकरी असणा-या भावाकडं अपेक्षा केली पण मदत नाही मिळाली. गावातील लोकांना मदत मागितली पण नाही मिळाली. शेतीतून उत्पन्न मिळाल नाही. कधी पिक चांगल यायच पण काहीतरी नैसर्गिक अपत्ती यायची आणि नुकसान व्हायचं. वंशाला मुलगा नाही याची खंत. बायकोबरोबर होणारी भांडण. घर चालवण्यासाठी घेतलेले सावकाराचे कर्ज जे दिवसेंदिवस वाढतच गेले. ते फेडता आले नाही म्हणून सावकाराने जमीन मागितली. त्याचा त्रास यशनानाला झाला. मग मात्र त्याला वाटलं की जगण आता शक्य नाही. म्हणून त्याने मृत्यू जवळचा केला. बायकोनेही नव-याचा शब्द प्रमाण मानला आणि दोघांही विष घेतलं.
     या सा-या अडचणीच्या काळात कोणत्यातरी टप्प्यावर जर गावातील कोणीही पाठीशी उभा राहिलं असतं आणि धिर दिला असता तर यशनानांन आत्महत्या केली नसती. आज कित्येक यशानाना आणि पार्वतीबाई आधार नाही म्हणून आत्महत्या करतात. कारण आज गावातील निर्मळ मनाची, प्रमाणिक, दुस-यांना आधार देणारी जाणकार पिढीचं संपुष्टात आलीय. जे आहेत त्यांना आजची गावव्यवस्था विचारात घेत नाही. अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रमाणिक गावकरी शिल्लक आहेत. ते या व्यवस्थेच्या बाहेर फेकले आहेत. एकटे पडलेत. गावात धुमाकूळ आहे तो स्वार्थी राजकारणी, सावकार, काही नौकरदार आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा. हा एक गट तयार झाला आहे.  त्यामुळे कष्टकरी लोकांना नैतिकतेने आधार देणारी गावव्यवस्था दिसेनासी झालीय. एवढ्यातही गावातील नवबौध्द जे आजही गरीब आहेत तेच मराठा व इतर जातीतील गरीबांना मदत करतात म्हणजे जात विसरून मदतीस येणारा हा वर्ग आर्थिक विवेचनातील आहे. आणि दुस-या बाजूला सर्व जातीतील श्रीमंत एका बाजूला येत आहेत आणि तेच गावावर राज्य करत आहेत. पण त्यात सर्वांगीन विकासाला आणि माणसाला मानसिक आधार देणा-या मूल्यांना महत्व नाही. यातून आहिरे आणि नाहिरे वर्गाचा उदय आज गावव्यवस्थेत बघायला मिळतोय. त्यामुळे अशा आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याच आठवड्यात जालना जिल्ह्यात तीन मुलीसह आईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. तिच्या नव-या ने काही महिन्यांनपूर्वच आत्महत्या केली होती. परवाच्या दिवशी बार्शीत एका कुटंबाने दोनमुलांसह विष घेवून आयुष्य संपवलय. कुठे चाललीय आपली मानवी व्यवस्था कोणी सांगेल का?
     कादंबरीत पुढे यशानानाच्या मृत्यू नंतर त्या तीन मुलीच काय होत? कोण आधाराला धावून येत.? उषा ही थोरली ,त्यामुळे सारी जबाबदारी तिच्यावर येते.. ती सावरण्याचा प्रयत्न करते पण तरीही गावातील नाठाळ लोकांच्या नजरा त्यां तिघी बहिणीना जगू देतील का? हे सारं आपणाला कादंबरीत सापडेल. उषा ही आर्मीतील सुभाष नावाच्या कानाड्याच्या मुलावर प्रेम करतेय. ते लाहनपणापासूनचे दोस्त आहेत. ती त्याच्याबरोबर पूळ्न जाणार असतेय आणि त्याच दिवशी अवकाळी पाऊस येतो. आणि घरी आई वडिल विष पेतात. आईला दवाखान्यात नेहलं जात. तिथ हा सुभाष मदतीला धावून जातो. गावातील आणि भावकीतिल एकच माणूस असतो. तिथली बिल हा सुभाष देतो. पण पार्वती काही वाचत नाही. तिच प्रेत मिळेपर्यंत गावकरी पोहचतात आणि त्यांची चर्चा सुरू होते की पोरगी पळून जाणार म्हणून आईने विष घेतलय. गावात उषावरच आरोप होतात. पण शेवटी उषाच स्वात:ला धीर देऊन लहान बहिनीना आधार देते. उषाचे चुलते गेल्यावर त्या घरात त्या तिघी राहातात. त्यावेळी मात्र त्यांची काय अवस्था होते ह्याची कल्पना न केलेली बरी. ज्या घरात काल पर्यंत आई-वडिलां सोबत राहेचे आणि आज तेच घरात नाहीत. त्यावेळी त्या चिमुकल्या मुलीची काय स्थिती झाली असेल. पुढं जगण्याचा त्यांना धिर मिळेल का? का त्यांनाही वाटेल आपण संपवून द्याव आयुष्य.. हे येणारा काळच सांगेल.
  आनंद विंगकर यांनी आत्महत्या घडण्यापूर्वीचं आणि घडल्या नंतरचं कुटंबातील व त्यांच्या अवतीभवतीच वातावरण जे मांडलय ते अस्वस्थ करतयं.

Thursday, September 5, 2019

तू आहेस तरी कोण?




         एक व्यक्ती दररोज फिरण्यासाठी नदी किना-यावर जायचा. तो किना-यावर फे-या मारायचा. लाट आली कि त्या लाटेसोबत छोटे छोटे मासे बाहेर यायचे. फे-या मारताना किना-यावर आलेले मासे तो एक एक घेऊन आत फेकायचा. असं दररोज घडायच.  त्या दिवशी मात्र नदीमध्ये पाणी भरपूर आलं. त्यामुळे खूप मासे बाहेर आले होते. तर त्या व्यक्तीने एक एक मासा घेऊन आत टाकायला सुरवात केली. समोरच्या बाजूला कोप-यावर एक म्हातारा बसलेला होता. त्याने विचारलं, “ ऒ पाव्हण, आव किती मास्यांना वाचवाल? सा-या किना-यावर मासंच मासं पसरलेलं आहेत.” त्यावर त्या व्यक्तीने काहीच न बोलता, पुढं वाकून बाहेर आलेला मासा उचलला आणि पाण्यात सोडला. हे करताना त्या म्हाता-याकडं बघत म्हणाला, “बाबा, मला माहित आहे की मी सर्वच मास्यांचे प्राण नाही वाचवू शकणार पण इकडं बघा जरा तुमच्या लक्षात येईल. मग परत त्या व्यक्तीने बाहेर तडफडणारा मासा उचलला आणि पाण्यात टाकला. “हे बगा बाबा, फरक या एका मास्याला पडतोय, तो कसा पण्यात आनंदात पोहतोय.” त्यावर त्या म्हाता-याने पुन्हा प्रश्न विचारल, “तू आहेस तरी कोण?” त्यावर त्या व्यक्तीने बाहेर पडलेला मासा आत फेकत उत्तर दिलं, “मी शिक्षक आहे. मला माहित आहे कि हजारो विद्यार्थ्यांच आयुष्य नाही घडवू शकत पण एका तरी विद्यार्थ्याच आयुष्य निश्चितच घडवू शकतो.
ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे एका तरी विद्यार्थ्यांच आयुष्य घडवलयं त्या सर्वना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!!

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts